देशात एकीकडे करोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंता सतावत असतानाच उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्याही दिलासा देणारी आहे. भारतात आतापर्यंत १५ लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान १० राज्यांमधील परिस्थिती जास्त चिंताजनक असून देशातील ८० टक्के रुग्ण या राज्यांमधील असल्याचंही आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. देशात रविवारी रुग्णवाढीचा नवा उच्चांक नोंदविण्यात आला. रविवारी २४ तासांत ६४,३९९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या २१ लाख ५३ हजारांवर पोहोचली. मात्र, देशातील करोना चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले असून, २४ तासांत सात लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत २ कोटी ४१ लाख ६ हजार ५३५ इतक्या चाचण्या करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. देशातील करोनामुक्तांचे प्रमाण ६८.७८ टक्के झाले आहे. India's #COVID19 recoveries cross the 15 lakh mark. Infection still remains concentrated in 10 states that contribute more than 80% of the new cases: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/0sYYaolYoC — ANI (@ANI) August 10, 2020 दैनंदिन चाचण्यांची संख्या वेगाने वाढत असून, गेल्या अनेक दिवसांपासून देशात ६ लाखांहून अधिक नमुने तपासले जात आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली. २४ तासांत विक्रमी ७ लाख १९ हजार ३६४ नमुने तपासण्यात आले असून आतापर्यंतची एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे, असे आयसीएमआरचे शास्त्रज्ञ आणि माध्यम समन्वयक डॉ. लोकेश शर्मा यांनी सांगितले. मृत्युप्रमाण २ टक्क्यांवर देशात गेल्या २४ तासांत ८६१ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ४३,३७९ वर पोहोचली. मात्र, देशातील मृत्युप्रमाण २.०१ टक्क्यांवर घसरले आहे. इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.