देशातील १३५ कोटी जनतेला लॉकडाउनच्या माध्यमातून घरात बसण्यास भाग पाडले तर सोशल डिस्टन्सींग ठेऊन एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे होणारा करोना विषाणूचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात थांबवता येईल. या २१ दिवसांच्या कालावधीमध्ये भारताला आपल्या आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करण्याचा वेळ उपलब्ध होईल, असे मत पब्लिक हेल्थ फाऊण्डेशन ऑफ इंडियाचे (पीएचएफआय) अध्यक्ष डॉक्टर के. श्रीनाथ रेड्डी यांनी व्यक्त केलं आहे. तसेच भारतामध्ये करोनाचे आणखीन रुग्ण सापडतील. मात्र त्यामुळे घाबरण्याचं कारण नसल्याचेही रेड्डी यांनी म्हटलं आहे. “प्रत्येक देशामध्ये करोनाचे रुग्ण वाढण्याल्याचे पहायला मिळालं आहे. रुग्णांची संख्या वाढल्यानंतर हळूहळू ती कमी झाल्याचे दिसून आलं आहे. तसचं उन्हाळा सुरु होणार असल्याने करोनाची साथ वेगाने पसरणार नाही,” असंही रेड्डी यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये लॉकडाउनमुळे करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येचा आलेख वाढणार नाही, असा विश्वास रेड्डी यांनी व्यक्त केला आहे. कोवीड-१९ चा संसर्ग हा सिझनल आजार होईल अशी शक्यताही रेड्डी यांनी व्यक्त केली. मात्र तोपर्यंत आरोग्य यंत्रणा, औषधे आणि करोनावर मात करणारी लस उपलब्ध असेल. त्यामुळे करोना पूर्णपणे नष्ट झाला नाही तरी त्यावर नियंत्रण मिळवता येईल, असं रेड्डी म्हणाले. मात्र हा रोग स्वाइन फल्यूपेक्षा (एचवन एनवन) अधिक वेगाने पसरत असल्याने आपल्याला खूप सावधान रहावं लागणार आहे, असा इशाराही रेड्डी यांनी दिला आहे. या मुलाखतीचा सारांश…

प्रश्न:
आपल्या देशात करोनाचे इतके रुग्ण नसताना सरकारने लॉकडाउनचा निर्णय का घेतला असावा?

डॉक्टर रेड्डी:
करोना हा खूप वेगाने पसरणार संसर्गजन्य रोग आहे त्यामुळे आपल्याला प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे. हा रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अत्यंत वेगाने पसरतो. त्यामुळे आपल्याला लोकांच्या हलचालीवर नियंत्रण आणणं गरजेचं आहे नाहीतर संपूर्ण देशामध्ये हा रोग पसरु शकतो. लॉकडाउनमुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग नियंत्रणात राहिल्याने एका गटातून एका व्यक्तीच्या माध्यमातून इतर अनेकांपर्यंत हा रोग पसरणार नाही. तसेच यामुळे एखाद्या व्यक्तीला करोनाची बाधा झाली असेल तर तिच्या उपचार करण्याचा तसेच तिच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटवून त्यांच्या चाचण्याकडून या रोगाचा पुढे प्रसार होणार नाही याची काळजी घेता येईल.

प्रश्न:
भारताचा पुढचा संघर्ष कसा असेल? या रोगाचा प्रसार थांबवता येईल का?

डॉक्टर रेड्डी:
या लढाईमध्ये आपल्या बाजूने असणाऱ्या घटकांचा आपण विचार करायला हवा. सार्वजनिक आरोग्य सुरक्षित राहिल यासाठी काही उपाययोजना आपण केल्या आहेत त्या भविष्यात अधिक कठोर करता येतील. तसेच देशातील आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करणेही गरजेचे आहे. या आजाराचा संसर्ग झाल्याने चिंताजनक परिस्थितीत असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेश्या संख्येने आयसीयु उपलब्ध असणे गरजेचे आहे.

या विषाणूवर उष्णतेचा परिणाम होत असेल तर येणाऱ्या उन्हाळ्याचा आपल्याला फायदाच होईल. काही अहवालांमध्ये या विषाणूवर उष्णतेचा विपरित परिणाम होतो असं म्हटलं आहे. असं असेल तर हे आपल्या दृष्टीने फायद्याचे ठरले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे सबलिकरण आणि वातावरणाची मदत झाल्यास एप्रिलच्या मध्यापर्यंत किंवा एप्रिल संपेपर्यंत हा रोग पसरण्याचा वेग कमी करता येईल. मात्र आपल्याला महिना दोन महिने अत्यंत सतर्क रहायला हवं. तसेच हिवाळ्यामध्ये ही साथ पुन्हा आली तर त्यासाठीही आपण तयार रहायला हवं. मात्र तोपर्यंत तयारीसाठी आपल्या हातात पुरेसा वेळ असेल.

नक्की वाचा >> “…म्हणून भारतामध्ये करोनामुळे जास्त मृत्यू होणार नाहीत”; ICMR च्या माजी अध्यक्षांचा दावा

प्रश्न:
लॉकडाउनचा दिर्घकालीन परिणाम पहायला मिळेल का?

डॉक्टर रेड्डी:
हा रोग कसा पसरतो त्याचा वेग किती आहे याबद्दल अगदी योग्य अंदाज लावणं कठीण आहे, कारण अशाप्रकारचा संसर्ग याआधी कधी पाहण्यात आलेला नाही. हा खूप वेगाने पसरणारा रोग असल्याने त्याच्या प्रतिबंधाचे उपायही तेवढेच परिणामकारक असणे गरजेचे आहे. सार्जनिक ठिकाणी या रोगाचा प्रसार थांबवायचा असेल तर लॉकडाउन हा उत्तम पर्याय असल्याचे साथीच्या रोगांसंदर्भात अभ्यास करणाऱ्या ‘द एम्पिरल कॉलेज ऑफ लंडन’ने म्हटलं आहे.

प्रश्न:
लॉकडाउनदरम्यान आणि नंतर काय काळजी घेतली पाहिजे?

डॉक्टर रेड्डी:
लॉकडाउनदरम्यान आपण आपल्या दैनंदिन जिवनामध्ये बदल करुन कमीत कमी लोकांशी थेट संपर्क ठेवला पाहिजे. घरातच थांबलं पाहिजे. जर सार्वजनिक ठिकाणी जाण्याची गरज पडली तर इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे. शहरांमध्ये भटकणं बंद केलं पाहिजे. कुटुंब वगळता कोणाशीही थेट संपर्क टाळला पाहिजे. घरीही सुद्धा एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवलं पाहिजे आणि स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे.

नक्की वाचा >> मोदी सरकारच्या ‘लॉकडाउन’ला यश, भारतातील करोनाग्रस्त वाढण्याचा वेग मंदावला

प्रश्न:
करोनाबद्दल भयभित होण्याची गरज आहे का?

डॉक्टर रेड्डी:
प्रत्येक देशामध्ये करोनाग्रस्तांची संख्या भरमसाठ वाढल्याचे दिसून आलं आहे. त्यानंतर मात्र ही संख्या कमी होताना दिसले. भारतामध्येही करोनाग्रस्तांची संख्या वाढेल. मात्र आपण घाबरुन जाता कामा नये कारण प्रत्येक देशामध्ये हेच झालं आहे. आपण कमीत कमी लोकांपर्यंत हा संसर्ग होईल याची काळजी घेत रुग्णांची संख्या कमी होण्याच्या टप्प्यात लवकरात लवकर कसं पोहचता येईल याबद्दल विचार केला पाहिजे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्यास साथ पसरली असून आपल्याला धोका आहे असं समजून घाबरुन जाण्याचं कारण नाही.

प्रश्न:
करोनामुळे मृत्यूचे प्रमाण किती आहे?

डॉक्टर रेड्डी:
करोना वेगाने पसरत असला तरी तो एक मध्यम स्तरातील विषाणू आहे. म्हणजेच यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अगदी एक ते तीन टक्क्यांच्यादरम्यान आहे. ज्या देशांनी योग्य निर्णय घेतले तिथे तर मृत्यूचा दर अगदी कमी आहे. दक्षिण कोरियामध्ये हा दर ०.६ टक्के इतका आहे. त्यामुळेच योग्य उपाययोजना केल्यास भारतामध्येही हा दर एक ते दोन टक्क्यादरम्यान राहिलं.

वयस्कर लोकांना म्हणजेच ६० वर्षांवरील लोकांना संसर्ग झाल्यास मृत्यूचा दर वाढण्याची शक्यता असते. यापैकी अनेकांना मधुमेह, हृद्यरोग किंवा श्वसनाशी संबंधित आजार असतात किंवा ज्यांची रोगप्रितिकारक शक्ती कमी असते अशांना संसर्ग झाल्यास धोका अधिक असतो. धुम्रपान करणाऱ्यांनाही या रोगाचा अधिक धोका असतो कारण धुम्रपानामुळे त्यांच्या फुफुसांवर आधीच परिणाम झालेला असतो.

प्रश्न:
मुलं सुरक्षित आहेत का?

डॉक्टर रेड्डी:
जगभरातील आकडेवारी पाहिली तर मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच मुलांचा मृत्यू झाल्याचेही कुठे ऐकिवात नाही. त्यामुळे या विषाणूचा संसर्ग झाला तरी मुलं थोडी आजारी पडतात मात्र त्यामधून ते सावरण्याची आणि पूर्णपणे बरी होण्याची शक्यता खूप जास्त आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus rising coronavirus cases no cause for panic will fall by april end dr reddy scsg
First published on: 27-03-2020 at 11:49 IST