करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पहिल्या लाटेपेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज तीन लाखांहून अधिक नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत असून, वाढत्या मृत्यूची संख्येनं काळजी भर टाकली आहे. देशात मागील काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद होत आहे, असं असतानाच अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाने काळजाचा ठोका चुकवणारा इशारा दिला आहे. देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज ५ हजाराहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

करोनाच्या वेगवेगळ्या स्ट्रेनमुळे भारतात करोना संसर्गचा वेग प्रचंड वाढला आहे. दररोज तीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असून, वाढत्या रुग्णसंख्येपाठोपाठ आता मृत्यूंचा आकडाही वाढू लागला आहे. देशात मागील काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक करोना मृत्यूची नोंद होत आहे. त्यात आता वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे.

इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने कोविड-१९ प्रोजेक्शन शिर्षकाखाली एक अभ्यास केला. या अभ्यासाचा अहवाल १५ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला असून, अभ्यासात दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यात लसीकरणावर आशा व्यक्त करण्यात आलेली आहे. करोनाच्या आपत्तीमुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल, असा इशारा इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासाच्या आधारे दिला आहे. तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे.

इन्स्टिट्यूटने चालू वर्षात भारतात करोना मृत्यूसंख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. १० मे रोजी भारतात ५ हजार ६०० जणांचा करोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला असून, १२ एप्रिल ते १ ऑगस्ट या कालावधीत देशात ३ लाख २९ हजार जणांचा करोनामुळे मृत्यू होऊ शकतो. तसेच जुलै अखेरीपर्यंत एकूण ६ लाख ६५ हजार मृत्यू होऊ शकतात, असंही इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्युशनने अभ्यासात म्हटलं आहे.

मास्क न वापरण ठरतंय घातक

मास्कच्या वापराबद्दलही अभ्यासात काही निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. मास्कच्या वापरामुळे एप्रिलच्या अखेरीपर्यंत हा आकडा ७० हजारांपर्यंत कमी होऊ शकतो. सप्टेंबर २०२० च्या मध्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यावधी पर्यंत करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूमध्ये घसरण होत होती. एप्रिलमध्ये अचानक यात वाढ झाली. पहिल्या लाटेपेक्षा दुप्पटीने करोना रुग्णवाढ झाल्याचं दिसून आलं. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या ७१ टक्क्यांने वाढली आणि दररोज होणारे मृत्यू ५५ टक्क्याने वाढले. करोना नियमावलीचं पालन न केल्यानं, सोहळ्यांना झालेली गर्दी आणि मास्क वापरण्यास नागरिकांकडून नकार दिल्यानेच ही वाढ झाल्याचं संस्थेनं म्हटलं आहे.