करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अक्षरशः थैमान घातलं आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्ली पाठोपाठ देशातील इतर राज्यांतही करोनानं हातपाय पसरले असून, दररोज झोप उडवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. देशात पहिल्या लाटेतील उच्चांकांच्या दुप्पट रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेत नोंदवली गेली आहे. शुक्रवारी पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली असून, मृत्यूचा आकडाही हजारांच्या पुढे आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात १ हजारांपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद झाली आहे. करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून, गेल्या २४ तासांत देशात दोन लाखांहून अधिक जणांना करोनाची लागण झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील गेल्या २४ तासांतील करोना परिस्थितीची आकडेवारी जाहीर केली आहे. यात रुग्णासंख्या वाढीबरोबरच मृत्यूंची संख्या वाढत असल्याचंही समोर आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाख १७ हजार ३५३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १ लाख १८ हजार ३०२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब म्हणजे देशातील मृतांचा आकडा सलग तिसऱ्या दिवशी एक हजारांच्या पुढे आहे. २४ तासांत भारतात १ हजार १८५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ लाख ७४ हजार ३०८ झाली आहे. आणखी वाचा- धोक्याचा इशारा! भारतात कोविडमुळे दररोज २ हजार २३० जणांचा होऊ शकतो मृत्यू India reports 2,17,353 new #COVID19 cases, 1,18,302 discharges and 1,185 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry Total cases: 1,42,91,917 Total recoveries: 1,25,47,866 Active cases: 15,69,743 Death toll: 1,74,308 Total vaccination: 11,72,23,509 pic.twitter.com/dQYtH8QCN6 — ANI (@ANI) April 16, 2021 दिल्लीत वीकेंड लॉकडाउन करोनाप्रसार रोखण्यासाठी हरयाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील दहा जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू झाली करण्यात आली आहे. दुसरीकडे दिल्लीतही करोनाची साखळी तोडण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वीकेंड लॉकडाउनची घोषणा केली असून, अनेक निर्बंध घालण्यात येणार असल्याचं गुरुवारी सांगितलं. मॉल, व्यायामशाळा, स्पा आणि सभागृहे बंद ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. उपाहारगृहांमध्ये बसून भोजन करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर चित्रपटगृहांमध्ये एकूण क्षमतेपैकी केवळ ३० टक्केच प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली आहे.