करोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात भीती व्यक्त केली जात असतानाच सरकारकडून करोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या लसीकरण मोहिमेचा भाग म्हणून मागील काही दिवसांपासून देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लसीकरण उत्सवाअंतर्गत जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मध्य प्रदेशमध्ये नवीन लसीकरण धोरणाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक लोकांना लस देण्याचा विक्रम करण्यात आला. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १७ लाखांहून अधिक जणांना एकाच दिवशी लस देण्यात आल्याचा दावा केलाय. मात्र आता मध्य प्रदेश सरकारकडून करण्यात येणाऱ्या या दाव्यासंदर्भात शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे. मध्य प्रदेश सरकारने एका १३ वर्षाच्या मुलाला लस दिल्याचा ऑन पेपर दावा केलाय. विशेष म्हणजे या मुलाचं लसीकरण केल्याचा मेसेज पाठवण्यात आला असून वय ५६ असल्याचं सांगण्यात आलंय.

नक्की वाचा >> ठाणे : एकाच वेळी २८ वर्षीय महिलेला दिले करोना लसीचे तीन डोस?; भाजपाने केली चौकशीची मागणी

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार २१ जून रोजी म्हणजेच मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या लसीकरण उत्सवाच्या दिवशी भोपाळमध्ये राहणाऱ्या १३ वर्षीय वेदांत नावाच्या मुलाचं लसीकरण करण्यात आल्याचा दावा केला जातोय. करोना लसीकरणाचा प्रमाणपत्रावर या मुलाचं वय ५६ दाखवण्यात आलं आहे. वेदांतचे वडील रंजीत डांगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार २१ जून रोजी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एक एसएमएस आला. या एसएमएसमध्ये वेदांतला लस देण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं. वेदांत केवळ १३ वर्षांचा असून देशात लहान मुलांचं लसीकरण अद्याप सुरु झालेलं नाही. यासंदर्भात तक्रार करण्याचा प्रयत्न रंजीत यांनी केला मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. या मेसेजमध्ये पाठवण्यात आलेल्या लिंकवर लसीकरणाचं प्रमाणपत्र रंजीत यांनी डाऊनलोड केलं असता वेदांतच्या नावाने लसीकरण करण्यात आल्याचं प्रमाणपत्र बनवताना काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेमध्ये अन्य एका कामासंदर्भात जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांवरुन माहिती घेण्यात आल्याचं उघड झालं.

नक्की वाचा >> Explained : लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढलं तर काय होतं?; त्याचे दुष्परिणाम होतात का?

मध्य प्रदेश काँग्रेसने करोना लसीकरणासंदर्भातील या गोंधळावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी अशाप्रकारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. सरकारने विक्रमाच्या नादात आकडेवारीमध्ये मोठा गोंधळ घातल्याचा आरोप सलूजा यांनी केलाय. मध्य प्रदेशमधील १३ वर्षाच्या मुलाला आणि मरण पावलेल्यांचंही लसीकरण करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. बैतूलमधील ४७ गावांमध्ये एकाही व्यक्तीचं लसीकरण करण्यात आलेलं नाही. रेकॉर्ड हा केवळ दावा आहे असंही सलूजा म्हणाले.