देशाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात प्रसारमाध्यमांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भाजपच्या वतीने आयोजित ‘दीपावली मंगल मिलन’ या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम दिल्लीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले.

शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. एक काळ असा होता की, पत्रकारांना शोधावे लागत असे, आता मात्र प्रसारमाध्यमांच्या कक्षा रूंदावल्या आहेत त्यामुळे पत्रकार मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत लोकशाहीसाठी ही बाब निश्चितच चांगली आहे. देशात सुधारणा कशा प्रकारे व्हायला हव्यात याबाबत पत्रकार सूचना देतात, राजकारण्यांनी नेमके कोणत्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवे हेदेखील पत्रकारांमुळे समजते असेही मोदी यांनी म्हटले.

स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले ते प्रसारमाध्यमांच्या भूमिकेमुळेच त्यांनी ज्या प्रकारे या अभियानाला प्रसिद्धी दिली त्याचमुळे हे अभियान घरोघरी ठाऊक झाले असेही मोदी यांनी स्पष्ट केले. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. दीपावली मिलन महोत्सवाची सांगता झाल्यावर अनेक पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या भाषणानंतर मोदींनी अनेक पत्रकारांची भेट घेतली आणि आनंदाने त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.