केंद्र सरकारविरुद्ध बंडाळी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असणारे भारताचे निवृत्त लष्करप्रमुख जन. व्ही. के. सिंग यांनी भारतीय संसदीय लोकशाही पद्धतीत लष्कराला अशी बंडाळी करणे अशक्य असल्याचा दावा केला आहे. यानिमित्ताने लष्करी बंडाळीबाबत लष्करप्रमुखांनी प्रथमच उघडपणे भाष्य केले आहे.
१६ जानेवारी, २०१२ या दिवशी हरयाणातील हिस्सार येथील सशस्त्र तुकडी आणि उत्तर प्रदेशातील आग्रा येथे तैनात करण्यात आलेली निमलष्करी जवानांची तुकडी यांनी आपापल्या स्थळांवरून दिल्लीकडे कूच करण्याचे आदेश जन. व्ही. के. सिंग यांनी दिले होते आणि हे लष्करी कूच ‘राजकीय उद्दिष्टांनी’ प्रेरित होते, असा आरोप लष्करप्रमुखांवर केला गेला होता.
 या आरोपाबाबत विचारणा केली असता लष्करप्रमुखांनी ‘नाही.. त्रिवार नाही.. अगदी ठळक फाँटमध्ये छापावं’, असे उत्तर दिले. सैन्याच्या अवघ्या दोन तुकडय़ा केंद्र सरकार उलथवू शकतात, असा दावा करणेच मुळात मूर्खपणाचे आहे. तो सगळा प्रकार माझी प्रतिमा डागाळण्यासाठी करण्यात आला होता, असे सिंग म्हणाले. पण यात भारतीय सैन्याची प्रतिमाही डागाळली गेली, याची खंत त्यांनी व्यक्त केली. एका व्यक्तीवर शरसंधान करताना आपण एका व्यवस्थेचा बळी देत आहोत, याचे भानही आरोपकर्त्यांना राहिले नाही, असे सिंग म्हणाले.