गोदावरी नदीत २०१९ मध्ये झालेल्या बोटीच्या दुर्घटनेत आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममधील अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांनी आपल्या दोन्ही मुलींना गमावलं होतं. या दुर्घटनेने या दाम्पत्याला मोठा धक्का दिला. मात्र, आता बरोबर दोन वर्षांनंतर त्याच तारखेला या दोघानांच्याही आयुष्यात पुन्हा आनंदाचे क्षण आले आहेत. अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांना जुळ्या मुली झाल्या आहेत.

१५ सप्टेंबर २०१९ रोजी पूर्व गोदावरी जिल्ह्यातील काचुलुरूजवळ गोदावरी नदीत एक बोट बुडाली. या दुर्घटनेत अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांनी त्यांच्या दोन्ही मुलींना गमावलं होतं. यापैकी एक मुलगी अवघ्या एका वर्षाची आणि दुसरी मुलगी तीन वर्षांची होती. या दोन्ही मुली यावेळी आपल्या आजीसोबत तेलंगणातील भद्रद्री कोठागुडेम जिल्ह्यातील गोदावरीच्या काठावर असलेल्या प्राचीन भद्राचलम मंदिरात जात होत्या.

विशाखापट्टणम येथील या दुर्घटनेत ५० प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, आता बरोबर २ वर्षांनंतर १५ सप्टेंबर याच तारखेला या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. अप्पाला राजू आणि भाग्यलक्ष्मी यांना जुळ्या मुली झाल्या आहेत. “हा देवाचाच आशीर्वाद आहे”, अशा शब्दांत यावेळी या दाम्पत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.