दिवसभरात ५०,१२९ नवे रुग्ण नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत करोनाचे ५०,१२९ रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णसंख्या ७८,६४,८११ वर पोहोचली आहे, मात्र त्यातील ७०,७८,१२३ रुग्ण करोनामुक्त झाले असून, हे प्रमाण ९० टक्केआहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. देशभरात ६,६८,१५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या सलग तीन दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांची संख्या सात लाखांहून कमी आहे. एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण ८.५० टक्के आहे. देशातील रोजच्या रुग्णसंख्येत उत्तरोत्तर घट होत आहे. देशाच्या एकूण रुग्णसंख्येने ७ ऑगस्ट रोजी २० लाखांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी ३० लाख, तर ५ सप्टेंबर रोजी ४० लाख रुग्णसंख्येचा टप्पा पार झाला. १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख आणि ११ ऑक्टोबरला रुग्णसंख्येने ७० लाखांचा टप्पा पार केला होता होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढ उतरणीस लागली असून, रोजच्या मृतांमध्येही घट नोंदविण्यात येत आहे. देशात आतापर्यंत १०,२५,२३,४६९ करोना चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी ११,४०,९०५ चाचण्या शनिवारी करण्यात आल्या, असे ‘आयसीएमआर’ने म्हटले आहे. करोनाबळींमध्ये घट देशात गेल्या २४ तासांत करोनाने ५७८ रुग्णांचा बळी घेतला. तीन महिन्यांनंतर प्रथमच इतक्या कमी करोनाबळींची नोंद झाली आहे. देशातील एकूण मृतांची संख्या १,१८,५३४ झाली आहे. मृतांचे हे प्रमाण १.५१ टक्के आहे. ते एका टक्क्याखाली आणण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.