CoronaVirus Outbreak : करोनाच्या तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक करोनातून बरे होत आहेत. पण असे असले तरी सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढत आहे. राज्यात देखील करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीसाठी पीएम केयर निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास उत्तम प्रतिसाद मिळत असून अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता करोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावली आहे.

योग्य ती काळजी आणि उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो, यावर साऱ्यांचा विश्वास असून भारतातही याबाबत जनजागृती केली जात आहे. म्हणूनच सर्व स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी प्रतिसाद दिल्यानंतर मुंबईकर रोहित शर्मादेखील सरासावला आहे. रोहितने प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये ४५ लाख, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २५ लाख, ‘फिडिंग इंडिया’साठी ५ लाख तर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या देखभालीसाठी ५ लाख अशी एकूण ८० लाखांची आर्थिक मदत केली आहे.

त्याआधी काल अनुष्का आणि विराट यांनीही पीएम-केयर्स फंड आणि मुख्यमंत्री सहायता निधीला (महाराष्ट्र) साथ देणार असल्याचे सांगितले. तसेच मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने केंद्र आणि राज्य सरकारला प्रत्येकी २५ लाख, बीसीसीआयने ५१ कोटी, कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने ५० लाख केंद्र आणि राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे.