करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला ऑक्टोबरनंतर तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो. केंद्र सरकारच्या विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने स्थापन केलेल्या वैज्ञानिकांच्या तीन-सदस्यांच्या समितीकडून काही अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार, जुलैमध्ये दुसरी लाट ओसरण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी समितीन तिसऱ्या लाटेत कोणत्या राज्यात रुग्णसंख्या कमी होऊ शकते आणि कोणत्या राज्यांना फटका बसू शकतो याचाही अंदाज वर्तवला आहे.

“महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, केरळ, सिक्कीम, उत्तराखंड, गुजरात, हरियाण, दिल्ली आणि गोवा या राज्यांनी आधीच शिखर गाठलं आहे,” असं समितीचे सदस्य असणारे आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांनी सांगितलं आहे. मॉडेलनुसार, तामिळनाडूत २९ मे ३१ मे दरम्यान आणि पुद्दुचेरीत १९ ते २० मे दरम्यान रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्राला करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका?; शास्त्रज्ञांच्या समितीने दिली महत्वाची माहिती

पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांनी अद्याप रुग्णवाढ पाहिलेला नाही. आसाममध्ये २०-२१ मे, मेघालयमध्ये ३० मे आणि त्रिपुरामध्ये २६-२७ मे रोजी रुग्णसंख्येचं शिखर गाठलं जाऊ शकतं. दरम्यान उत्तरेकडे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये सध्या रुग्णवाढ दिसत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये २४ मे आणि पंजाबमध्ये २२ मे रोजी मोठी रुग्णवाढ पहायला मिळू शकते.

सूत्र (SUTRA – Susceptible, Undetected, Tested (positive), Removed Approach) मॉडेलचा वापर केल्यास मे महिन्याच्या अखेर दिवसाला दीड लाख आणि जून महिन्याच्या अखेर दिवसाला २० हजार रुग्ण आढळतील असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे.

मॉडेलनुसार, करोनाची तिसरी लाट सहा ते आठ महिन्यांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणामही उशिरा जाणवू शकतो. “लसीकरणामुळे प्रतिकारशक्ती वाढली असेल त्यामुळे अनेकजण तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित असतील,” अशी मााहिती अग्रवाल यांनी दिली आहे. ऑक्टोबर २०२१ पर्यंत करोनाची तिसरी लाट येणार नाही असंही ते म्हणाले आहेत.