प्रशासकीय सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत व्हावी यासाठी आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी आसाममध्ये पाच नव्या जिल्ह्य़ांच्या निर्मितीची घोषणा स्वातंत्र्यादिनाच्या पाश्र्वभूमीवर केली.स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहन केल्यावर भाषणात गोगोई म्हणाले की, विद्रोही गटाला त्वरित आर्थिक विकास अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनाला जनतेच्या जवळ आणण्यासाठी मी नव्या पाच जिल्ह्य़ांच्या निर्मितीची घोषणा करत आहे. पाच नव्या जिल्ह्य़ांमध्ये बिस्वनाथ, चारायदेव, होजाय, दक्षिण सालमारा-मनकाचार आणि पश्चिम कारबी यांचा समावेश आहे. सध्या आसाममध्ये २७ जिल्हे आहेत. गोगोई म्हणाले की, राज्य सरकारने जिल्हा विकास आयुक्त हे पद निर्माण केले असून त्यामुळे विकासाच्या दृष्टीने अधिक सविस्तर काम करता येणार आहे. आसाममधील जमीन विकासाबाबतही विचार करण्यात आला असून त्यानुसार कार्यवाही लवकरच करण्यात येईल. आसाममधील आदिवासी जमातींच्या विकासासाठी देखील विविध योजना आणण्याचा आम्ही निर्णय घेतला असून त्याचा लाभ सूत, गरिया, मादाही, हाजोंग या जमातीतील लोकांना होणार आहे. गोगोई म्हणाले की, राज्यातील काही जमातींचा अनुसूचीत जमाती गटात समावेश करण्यासाठीही आम्ही धोरण ठरविले आहे. त्यामुळे या जमातीतील लोकांना केंद्र आणि राज्य सरकारचे विविध लाभ घेणे शक्या होणार आहे.राज्याच्या आर्थि विकासाबाबत गोगोई म्हणाले की, राज्याच्या आर्थिक विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्याच्या विविध भागातील विकासासाठी निधीची आवश्यकता आहे. केंद्राने मदतीचे आश्वासन दिल्यामुळे आम्हाला निधी मिळेल. त्यानुसार राज्यातील उद्योगाला चालना देण्याचेही आमच्यासमोर आव्हान आहे.