भारत सरकार लवकरच सुरक्षादलातील सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन गाड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. नक्षली भाग, जम्मू आणि काश्मीर आणि दूर्गम भागात तैनात करण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी आता अधिक सक्षम आणि सुरक्षित असणाऱ्या माईन प्रोटेक्डेट गाड्यांच्या खरेदीला मंजूरी दिली आहे. सरकारने ६१३ कोटी ९६ लाखांचे बजेट पास केले आले आहे. या पैश्यांमधून केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) माईन प्रोटेक्डेट म्हणजेच स्फोटांपासून संरक्षण करणाऱ्या गाड्या, बुलेटप्रूफ जॅकेट, रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय सुरक्षा दलासाठी (एनएसजी) १६ कोटी ८४ लाखांची तरतूद करण्यात आली असून या पैश्यांमधून रोमोटने चालणारी सात वाहने विकत घेतली जाणार आहेत.

सध्या नक्षलग्रस्त तसेच जम्मू काश्मीरमधील काही भागांमध्ये सीआरपीएफ माइन प्रोटेक्टेड व्हेइकल्स (एमपीव्ही) वापरतात. या गाड्यांमध्ये एका वेळेस सहा जवान प्रवास करु शकतात. नवीन गाड्या सुरक्षादलाच्या ताफ्यात शामील झाल्यानंतर सुरक्षादलांना नक्षलवादी तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणाऱ्या एलईडी हल्ल्यांना अधिक सक्षमपणे उत्तर देता येईल असं गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिमोटने चालणाऱ्या सात आरओव्ही (रिमोटेडली ऑप्रेटेड व्हेइकल्स) एनएसजीच्या ताफ्यात सहभागी होणार आहेत. या गाड्यांच्या मादतीने इमारती, बस, मेट्रो तसेच रेल्वे स्थानकांमध्ये जवानांच्या उपस्थितीशिवाय एलईडी निकामी करता येऊ शकतील. या आरओव्ही गाड्या ४५ डिग्रीमध्ये शिड्या तसेच चढ उतार असणाऱ्या ठिकाणी ८ किलोपर्यंतचे वजन घेऊन जाऊ शकतात. या गाड्यांवर एमएमजी गन, एमपी फाइव्ह हत्यारे आणि शॉर्टगन सारखी हत्यारे लावण्याची सोय आहे. या गाड्यांवरील कॅमेरासारख्या सिस्टीमुळे गाडीच्या आजूबाजूचा परिसर रिमोटने ती चालवणाऱ्यांना थेट केबिनमध्ये दिसण्याची सोय असून यात एक्स रे स्कॅनर्सचीही सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

सध्या एनएसजीच्या ताफ्यात रेनॉल्ट शेर्पा लाइट या गाड्या आहेत. युद्धभूमीवर जलदगतीने हलचाल करण्यासाठी, शस्त्रे वाहून नेण्यासाठी या गाड्या उपयुक्त आहेत. या गाड्यांमध्ये ४.७६ लीटरचे इंजिनबरोबरच ४ सिलेंडर टर्बो चार्ज डिझेल इंजिन आहे. ४x४ प्रकारातल्या या गाडीत २.२ टन वजनाचे साहित्य आणि एका वेळी १० जणांना घेऊन जाण्याची क्षमता आहे. या गाडीचे वजन ११ टन इतके असले तरी गाडीचा सर्वोत्तम वेग ११० किलोमीटर प्रती तास इतका असून एकदा इंधन भरल्यानंतर गाडी एक हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास करु शकते.

आयईडीच्या मदतीने नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जिवितहानी होते. जम्मू आणि काश्मीरमध्येही आयईडी हल्ल्यांमध्ये अनेकदा सैनिक शहिद झाल्याची उदाहरणे आहेत. म्हणूनच या सैनिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या गाड्या खरेदी केल्या जाणार आहेत.