दिल्ली विधानसभेचा निकाल स्पष्ट झाला आहे. भाजपाला धूळ चारत आपने या निवडणुकीत विजय मिळवला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा अरविंद केजरीवालच विराजमान होतील हे निश्चित झालं आहे. त्यानंतर ओखलाचे आपचे उमेदवार अमानतुल्लाह खान यांनी भाजपा आणि अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. ” दिल्लीच्या जनतेने आज अमित शाह आणि भाजपा यांना करंट दिला आहे. आज तिरस्काराचा पराभव झाला. कारण मला जनतेने रेकॉर्डब्रेक विजय मिळवून दिला आहे” असंही अमानतुल्लाह खान यांनी म्हटलं आहे.

भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारसभांदरम्यान एक वक्तव्य केलं होतं. ज्यामध्ये ते म्हणाले होते की, ” कमळाला मतदान करताना बटण इतकं जोरात दाबा की बटण शकूर बस्तीत दाबलं तरीही त्याचा करंट शाहीनबागमध्ये लागला पाहिजे” अमित शाह यांच्या या वक्तव्याचाच समाचार अमानतुल्लाह खान यांनी घेतला आहे.

दिल्लीत आज सकाळपासून जे कल हाती येत होते त्यामध्ये आप हा पक्ष आघाडीवरच होता. ६० पेक्षा जास्त जागा जिंकून आपने दिल्ली विधानसभेवर विजय मिळवला. तर ओखला या मतदारासंघातून ७० हजार मतांची आघाडी घेऊन अमानतुल्लाह खान हे विजयी झाले. त्यानंतर एएनआय या वृत्तवाहिनीशी बोलताना खान यांनी अमित शाह आणि भाजपावर टीका केली आहे.