देशासमोर आगामी काळात सायबर गुन्ह्य़ांचे मोठे आव्हान असून देशविघातक शक्ती या तंत्रज्ञानाचा वापर करून युवा वर्गाला चुकीच्या मार्गाने जाण्यास प्रवृत्त करत असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केले .
ग्राऊंड झिरो समीट-२०१५ या सुरक्षाविषयक चर्चासत्राच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. भारत सरकारकडून याविषयी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वाढत्या सायबर गुन्ह्य़ांना रोखण्यासाठी सक्षम सुरक्षा यंत्रणा उभारण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील असून युवा वर्गाला चुकीच्या मार्गावर नेण्याचे देशविघातक शक्तींचे प्रयत्न हाणून पाडू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उद्देशाने योग्य ती पावले भारत सरकारकडून टाकण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. याचबरोबर गृहमंत्रालयाकडून ४०० कोटी रुपये खर्च करून सायबर गुन्हे, लहान मुलांचे लैंगिक शोषण यावर नियंत्रण आणण्यासाठी इंडियन सायबर क्राईम समन्वय कक्ष (आयसी ४ )ची स्थापना करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
भारत सरकारच्या अतिसंवेदनशील दळणवळण यंत्रणावर आंतरराष्ट्रीय हॅकर्सकडून नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नांवर देखरेख ठेवणे, सायबर गुन्ह्य़ांविरोधात कायदेशीर यंत्रणांना सूचित करणे, शिवाय पीडितांच्या मदतीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच सुरक्षा यंत्रणा, सीबीआय आणि पोलीस यांना सायबर गुन्ह्य़ांविषयी आवश्यक माहिती पुरवण्याची मुख्य जबाबदारी या सायबर कक्षावर असणार आहे.