वादळी पावसाच्या तडाख्यात अडकलेल्या सुमारे ८५ जणांची कोस्ट गार्डने सुटका केली असल्याचे वृत्त आहे. तर, १२० जणांना दोन बोटींवर चढविण्यात आले असून त्यांना काही वेळातच सुखरुप ठिकाणी हलविण्यात येणार असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेनी दिली आहे.

अंदमान निकोबारला वादळी पावसाने झोडपले असून हॅवलॉक या बेटावर सुमारे १,४०० पर्यटक अडकले आहे. यामध्ये राज्यातील ९१ पर्यटकांचा समावेश असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

पर्यटकांच्या सुटकेसाठी नौदलाचे पथक अंदमान निकोबारमध्ये पोहचले असून एकूण ६ जहाजांद्वारे त्यांची सुटका करण्यात येणार आहे. मात्र वादळी वा-यांमुळे नौदलाच्या जहाजांना इच्छित स्थळी पोहोचण्यात अडथळे येत आहेत.

बेटावरील सर्व पर्यटक सुखरुप असून त्यांना वाचविण्याच्या कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याचे नायब राज्यपाल जगदीश मुखी यांनी म्हटले आहे.

अंदमान निकोबारमध्ये वादळी वा-यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला असला तरी वादळी वा-यांनी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक व्यवस्था कोलमडली असून पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

देशभरातील सुमारे १,४०० पर्यटक अंदमान निकोबारमध्ये अडकल्याचे वृत्त आहे. यामध्ये राज्यातील ९१ जणांचा समावेश आहे. सर्व पर्यटक सुखरुप असून अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अंदमान निकोबारमधील दोन बेट प्रसिद्ध असून या बेटांवरही पर्यटक अडकले आहेत.

त्यांच्या सुटकेसाठीही नौदलाचे पथक सज्ज आहे. वादळी वा-यामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल असा विश्वास स्थानिक प्रशासनाने वर्तवला आहे. गुरुवारी रात्रीपासून परिसरात ६० ते ७० किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत असल्याचे स्थानिकांनी सांगितले.