भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर तौते चक्रावादळचा (Tauktae Cyclone) धोका वाढू लागला आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर तौते चक्रीवादळात झाले आहे. सध्या हे वादळ लक्षद्वीप बेटांच्या परिसरातून पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागले असून तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय जल आयोगाने (Central Water Commissione) यासंदर्भात दोन्ही राज्यांसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. या दोन्ही राज्यांच्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा जल आयोगाकडून देण्यात आला आहे. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील किनारी भागातील स्थानिक प्रशासनाला सतर्क आणि तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वादळाला समोरं जाण्यासाठी संबंधित राज्यं आणि केंद्रीय मंत्रालयं / संस्थांच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Cyclone Tauktae : केरळ, तामिळनाडूला ऑरेंज अ‍ॅलर्ट, गंभीर पूरस्थितीचा धोका!

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत चर्चा झाली की, कॅबिनेट सचिव हे किनारपट्टीतील राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयं/ संबंधित यंत्रणांच्या मुख्य सचिवांशी सतत संपर्कात राहातील. केंद्रीय गृहमंत्रालय 24×7 परिस्थितीचा आढावा घेत आहे व राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश आणि संबंधित केंद्रीय संस्थांच्या संपर्कात आहे. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

या बैठकीत पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना असे निर्देश दिले की, सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यासाठी योग्य ती प्रत्येक व्यवस्था केली जावी. तसेच, नागरिकांना वीज, आरोग्य, पिण्याचे पाणी यासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळत राहातील, याची देखील सुनिश्चिती केली जावी. असेही सांगण्यात आले आहे.

तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रावर कुठे आणि काय होणार परिणाम?

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे.

NDRF च्या ५३ तुकड्या तैनात!

दरम्यान, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातील आणि प्रभावित होणाऱ्या राज्यांमधील आपातकालीन मदत यंत्रणा सज्ज झाली आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक लक्षद्वीप, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात या चक्रीवादळाचा कमी-अधिक प्रमाणात प्रभाव जाणवू शकतो. त्यानुसार सर्व पथकं सज्ज असल्याचं NDRF कडून सांगण्यात आलं आहे. “तौते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आणि त्या काळात मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफची ५३ तुकड्या सज्ज आहेत. यापैकी २४ तुकड्यांना आधीच संभाव्य प्रभावित क्षेत्रांमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर उरलेल्या २९ तुकड्या ऐन वेळी ५ सर्वाधिक धोका असणाऱ्या राज्यांमध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत”, असं एनडीआरएफकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Cyclone Tauktae : किनारपट्टीवर ६२, तर खाडीवरील ११५ गावांना सतर्कतेचा इशारा; समुद्र किनारे बंद

यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि सखल भागातील नागारिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे,” असं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे.

‘तौते’ वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील ५ तालुक्यांमध्ये संचारबंदी!

अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ निर्माण झालेले ‘तौते’ वादळ जिल्ह्यात जमिनीवर प्रवेश करणार नाही. किनारपट्टीला समांतर राहत ते रायगड, मुंबईमार्गे मंगळवारी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. पण ताशी सुमारे ५० ते ६० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रविवारी पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या भागात नुकसान होण्याचा संभव आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या नैसर्गिक संकटाला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, रत्नागिरी, गुहागर, दापोली आणि मंडणगड या ५ तालुक्यांच्या किनारी भागात फटका बसण्याची शक्यता गृहित धरून या पाचही तालुक्यांमध्ये रविवारी पहाटेपासून संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cyclone tauktae pm narendra modi took a high level meeting to review the preparedness msr
First published on: 15-05-2021 at 20:52 IST