दादरीप्रकरणी प्रयोगशाळेतील तपासणीचा निष्कर्ष
उत्तर प्रदेशातील दादरी येथे घडलेल्या घटनेत बिसरा खेडय़ात अखलाख नावाच्या मुस्लीम व्यक्तीस गाईचे मांस सेवन केल्याच्या संशयावरून जमावाने ठार मारले होते. या व्यक्तीच्या घरातील शीतकपाटात सापडलेला मांसाचा तुकडा हा बकऱ्याच्या मांसाचा होता, असे आता प्रयोगशाळेतील तपासणीत निष्पन्न झाले आहे.
सोमवारी तपासातील प्राथमिक निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी सप्टेंबरमध्ये अखलाख याच्या घरात गाईचे मांस असल्याची अफवा उठली होती. त्यानंतर जमावाने या पन्नास वर्षांच्या मुस्लिमास त्याच्या मुलीदेखत बाहेर फरपटत नेऊन लाथाबुक्क्य़ांनी तुडवून ठार केले होते. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्धनगर जिल्ह्य़ात दादरी येथील सरकारी पशुवैद्यकीय रूग्णालयाच्या उपमुख्य अधिकाऱ्यांनी अखलाखच्या घरातून जप्त केलला मांसाचा तुकडा म्हणजे बकऱ्याचे मटण होते असा निर्वाळा दिला आहे. प्रकरण क्रमांक २४१/५ तारीख २९/९/२०१५ अन्वये जरचा पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक तेजपालसिंग यांच्या विनंतीवरून पोलिसांनी जप्त केलेल्या मांसाच्या तुकडय़ाबाबत मी अहवाल सादर करीत आहे असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. अहवालात म्हटले आहे की, सदर मांसाचे तुकडे ४-५ किलो वजनाचे होते व ते अनारोग्यकारक होते. त्याचा रंग लाल होता, त्याला सडल्याचा वास येत होता. त्यात पांढरी चरबीही होती. हे मांसाचे तुकडे प्राण्याच्या मागच्या पायाचे होते. माझ्या चाचणीनुसार ते बकरीचे मांस होते व तरी अंतिम तपासणीसाठी त्याचे नमुने मथुरा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून उरलेल्या मांसाची विल्हेवाट लावण्यास पोलिसांना सांगितले आहे.
अखलाखच्या घरात गाईचे मांस सेवन केले जात आहे, असे मंदिरातील ध्वनिक्षेपकावरून जाहीर करण्यात आले. त्यामुळे २८ सप्टेंबरच्या रात्री दोनशे जणांचा जमाव त्याच्या घरावर चाल करून गेला व त्याला ठार केले. त्याचा मुलगा दानिश यात जखमी झाला. पोलिसांनी या प्रकरणी भाजपच्या स्थानिक नेत्याच्या मुलासह दहा जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतरही एका गृहरक्षकासह आणखी सात जणांना अटक करण्यात आली होती.

parenting tips
मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा ‘असा’ करा सदुपयोग
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?
loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस: जनतेला दरवेळी मूर्ख बनवता येत नाही