गेल्या काही दिवसांमध्ये दलित अत्याचार तसेच अॅट्रॉसिटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि त्यानंतर देशभरात उसळलेला हिंसाचार यामुळे भारतीय जनता पक्षातील खासदार स्वत:च्याच पक्षावर नाराज आहेत. उत्तर प्रदेशमध्येही सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या दलित खासदारांची नाराजी थांबताना दिसत नाहीये. भाजपाचा मोठा दलित चेहरा म्हणून ओळखल्या जाणा-या उदित राज यांचाही नाराजांमध्ये समावेश झाला आहे. 'या आठवड्याच्या सुरूवातीला भारत बंदच्या दरम्यान झालेल्या हिंसक आंदोलनानंतर देशातील विविध भागांमध्ये दलित समाजाच्या सदस्यांवर अत्याचार होत आहेत' असं उदित राज म्हणाले आहेत. Dalits r tortured at large scale after 2ndApril country wide agitation . Peoplefrom badmer,jalore,jaipur,gwalior,meerut , bulandshahr,karoli &other parts calling that not only anti reservatists but police also beating &slapping false cases. — Dr. Udit Raj, MP (@Dr_Uditraj) April 7, 2018 ट्विटरद्वारे उदित राज यांनी आरोप केले आहेत. दोन एप्रिल रोजी झालेल्या आंदोलनात सहभागी होणा-या दलितांवर अत्याचाराच्या बातम्या येत आहेत, पण हे थांबायला हवं. दोन एप्रिलनंतर देशभरात दलितांवर अत्याचार होत आहेत. बाडमेर, जालोर, जयपूर, ग्वालियर, मेरठ, बुलंदशहर, करोली आणि अन्य ठिकाणी अशाप्रकारच्या घटना होत आहेत. केवळ आरक्षणविरोधी लोकंच नाही तर पोलीस देखील मारहाण करीत आहेत, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडकवलं जात आहे, असा आरोप राज यांनी केला. यापूर्वी, सावित्रीबाई फुले (बहराईच), छोटेलाल खरवार (रॉबर्ट्सगंज) अशोक कुुमार दोहरे (इटावा) आणि यशवंत सिंग (नगिना) या चार खासदारांनी आपली नाराजी वा संताप लपवून न ठेवता जाहीरपणे व्यक्त केला आहे. त्यांनी दलितांच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका केली आहे.