बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या सरकारने राज्यात संपूर्ण दारूबंदी जाहीर केली आहे. देशी बनावटीच्या परदेशी दारूसह सर्व प्रकारची दारू आता राज्यात विकता येणार नाही. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दारूबंदीची घोषणा केली. बिहारमध्ये आता बार, रेस्टॉरंटस व अन्य कुठेही दारू मिळणार नाही. त्यांच्या सरकारने १ एप्रिलला ग्रामीण भागात देशी व इतर दारूवर बंदी घातली होती, पण गावे व शहरात परदेशी दारूच्या विक्रीला परवानगी कायम ठेवली होती. परंतु लोकांनी विशेष करून महिलांनी दारूबंदीला चार दिवसात पाटणा व इतर शहरात प्रचंड मोठा प्रतिसाद दिल्याने दारूवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता दारू विक्री व सेवनाचे परवाने हॉटेल, क्लब, बार यांना गावे व शहरातही मिळणार नाहीत. नितीशकुमार यांनी असे सांगितले की, लष्कर छावणी भागात हा आदेश लागू राहणार नाही कारण तेथे ते दारूचे नियंत्रण त्यांच्या मार्गाने करीत असतात. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी ताडीवर बंदीला त्या व्यवसायातील लोकांची रोजीरोटी जाईल असे सांगून विरोध केला होता. आता १९९१ चा नियम लागू केला असून केवळ नीरा पिण्यास परवानगी असून ताडीला बंदी घालण्यात आली आहे. नीरा व ताडी पामच्या झाडापासून काढली जाते. दारू उत्पादकांनी दारू उत्पादन करण्यास आडकाठी नाही पण ती राज्यात विकू देणार नाही, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले.