दिवाळीनिमित्त वाराणसीत श्रीरामाची आरती करणाऱ्या मुस्लिम महिलांविरोधात 'दारुल उलुम देवबंद'ने टीका केली आहे. या महिलांना दारुल उलुम देवबंद धर्मातून बहिष्कृतही केले आहे. अल्लाहशिवाय एकाही देवाला मानणारा मुस्लिम असूच शकत नाही. ज्या मुस्लिम महिलांनी रामाची आरती केली त्यांनी अल्लाहची माफी मागावी आणि कलमा वाचून पुन्हा धर्मात यावे असेही दारुल उलुम देवबंदने सुचवले आहे. वाराणसीमध्ये दिवाळीचे औचित्य साधत काही मुस्लिम महिलांनी श्रीरामाच्या मूर्तीची आरती केली होती. त्यानंतर अशा महिलांना बहिष्कृत केल्याचे दारुल उलुम देवबंदने स्पष्ट केले. मात्र आरती करणाऱ्या मुस्लिम महिलांनी याबाबत वेगळीच भूमिका मांडली आहे. अयोध्या हे एक धार्मिक स्थळ आहे, इथे श्रीराम वास्तव्य करतात. ते आपले पूर्वज आहेत. आपले धर्म आणि नावे बदलू शकतात पण पूर्वज नाही असे वक्तव्य नाजनीन अन्सारी नावाच्या महिलेने केले आहे. 'एएनआय'ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. श्रीरामाची पूजा केली तर हिंदू आणि मुस्लिम समाजात असलेली तेढ कमी होण्यास नक्कीच मदत होईल असेही नाजनीन यांनी स्पष्ट केले. If anyone worships any god except Allah they don't remain Muslim-Ulema,Darul Uloom on Muslim women who performed aarti on Diwali in Varanasi pic.twitter.com/IgaLNcenGo — ANI UP (@ANINewsUP) October 21, 2017 दिवाळी असल्याने 'मुस्लिम महिला फाऊंडेशन' आणि 'विशाल भारत संस्थान' यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम महिलांनी एकत्र येऊन श्रीरामाच्या मूर्तीची पूजा आणि आरती केली होती. या परंपरेची सुरूवात २००६ पासून करण्यात आली. २००६ मध्ये संकट मोचन मंदिराजवळ एक स्फोट झाला होता. त्यानंतर हिंदू आणि मुस्लिम समाजातील तेढ कमी व्हावी या उद्देशाने श्रीरामाची आरती करण्यात येते. मात्र याच परंपरेवर दारुल उलुम देवबंदने आक्षेप घेतला आहे. एवढेच नाही तर मुस्लिम महिलांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट करू नयेत असेही दारुल उलुम देवबंदने म्हटले आहे. अशा प्रकारे फोटो पोस्ट करणे इस्लाममध्ये हराम मानले जाते असेही या संस्थेने म्हटले आहे.