दिल्लीत सरकार स्थापन करण्याचा निर्णय आज रात्री किंवा उद्या सकाळी जाहीर केला जाईल असे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी आपने जनमताचा कौल मागितला आहे.
रविवार मत नोंदवण्याचा शेवटचा दिवस आहे. सरकार स्थापनेसंबंधी प्रश्न विचारला असता त्यांनी आज रात्री किंवा उद्या सकाळी निर्णय जाहीर करु असे सांगितले. आपला दिल्लीच्या जनतेकडून सरकार स्थापनेचा कौल मिळत आहे. आप जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार का ? या प्रश्नावर त्यांनी आप जाहीरनाम्यातील सर्व आश्वासने पूर्ण करेल असा दावा केला. जनलोकपाल विधेयक मंजुरी व दिल्लीतील वीजनिर्मिती कंपन्यांची झाडाझडती हे आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्याचे विषय असतील, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी काँग्रेस आणि भाजप हे दलाली करत असल्याचाही आरोप केला आहे.
सरकार स्थापन करण्याच्या निर्णयासंबंधी जनतेसोबत काही बैठका बाकी असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार स्थापन करण्याच्या निर्णयामध्ये जनतेची भूमिका महत्वाची असल्याचे ते म्हणाले. ‘आप’ भाजप आणि काँग्रेस या पारंपारिक पक्षांपेक्षा चांगली कामगिरी करुन दाखवेल असा दावा केजरीवाल यांनी शनिवारी केला होता.