भारत-चीन युद्धाविषयी गोपनीय ठेवण्यात आलेला हेंडरसन अहवाल अखेर ऑस्ट्रेलियन पत्रकार नेव्हिल मॅक्सवेल यांनी ऑनलाईन जाहीर केला आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी भारताची संरक्षण सिद्धता कितपत होती यावर प्रकाश टाकणारा हा अहवाल आहे.

या अहवालात भारतीय सन्याच्या त्या काळातील दैन्यावस्थेबाबत नवीन अशी कुठलीही माहिती नाही. युद्धकाळात दिल्लीत काम करणारे परदेशी पत्रकार मॅक्सवेल यांच्या मते भारतीय लष्कराला त्याही अवस्थेत चिनी आक्रमणाचे आव्हान पेलण्याचे आदेश होते.
लेफ्टनंट जनरल हेंडरसन ब्रुक्स व भारतीय लष्करी अकादमीचे तेव्हाचे कमांडंट ब्रिगेडियर पी. एस. भगत यांनी भारत-चीन युद्धाविषयीचा हा अहवाल लिहिला होता. १९६२ मध्ये नुकतेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ झालेले जे. एन. चौधुरी यांनी तयार करवून घेतलेला तो अहवाल आतापर्यंत भारत सरकारचे वर्गीकृत दस्तावेज होते.
एप्रिल २०१० मध्ये संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी संसदेत असे सांगितले होते की, या अहवालातील माहिती संवेदनशील असून सध्याच्या काळातही महत्त्वाचे संदर्भमूल्य असलेली आहे. पत्रकार मॅक्सवेल यांनी भारत-चीन युद्धातील पराभवाबाबत संकेतस्थळावर असे म्हटले आहे की, आपल्याला तो अहवाल नेहमीच उपलब्ध होता व तो खुला केला जाण्याची आपण नाट पाहात होतो. भारताने तो अहवाल प्रसृत करण्याची तयारी दाखवली नाही त्यामुळे आपल्याला त्यातील महत्त्वाचा भाग जाहीर करावा लागला.
धोरणाचे विश्लेषण
नेहरू सरकारच्या धोरणाचे विश्लेषण त्यात केले असून त्यावर टीकाही करण्यात आली आहे. मॅक्सवेल यांच्या मते या अहवालात पंडित नेहरू यांना चीन युद्धासाठी व्यक्तिगत जबाबदार ठरवण्यात आले आहे. राजकीय कारणास्तव हा अहवाल बराच काळ गुप्त ठेवण्यात आला, ते पक्षपातीपणाचे व कौटुंबिक कारणेही त्यात असावीत.
नवीन वादास सुरुवात ?
भारत-चीन युद्धातील भारताच्या पराभवाची चिरफाड करणारा हा अहवाल पत्रकार मॅक्सवेल यांनी ऑनलाईन जाहीर करून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला काँग्रेसच्या विरोधात आयते कोलित दिले आहे. काँग्रेस नेते हा अहवाल फेटाळतील हे गृहित असून त्यात ते या युद्धानंतर भारताने काँग्रेस राजवटीत केलेल्या प्रगतीचे पुरावे देत बसतील.