“१२ वर्षांपूर्वी भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यानंतर आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेत बदल करण्याच्या दिशेने विचार करण्यास भाग पाडलं होतं. १२ वर्षांचा कालावधी हा खुप मोठा असतो. परंतु २६/११ सारखी घटना स्वाभिमानी देश कधीही विसरू शकणार नाही. त्या दिवशी दहशतवादानं देशाच्या सार्भभौमत्वाला आव्हान दिलं होतं. आपल्या जवानांनी कोणत्याही दहशतवाद्याला जिवंत परत जाऊ दिलं नव्हतं याचा आम्हाला अभिमान आहे,” असं मत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं. तसंच २६/११ सारखा हल्ला आता भारताच्या भूमीवर होणं अशक्य असल्याचंही ते म्हणाले. हिंदुस्तान टाईम्सनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

“आज देशात राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत अनेक बदल करण्यात आले आहे. आम्ही त्यामुळे देशवासीयांना देशातील अंतर्गत आणि सीमांवरील संरक्षण अधिक मजबूत केलं असल्याचा विश्वास देऊ शकतो. आता २६/११ सारखा हल्ला पुन्हा भारताच्या भूमीवर करणं अशक्य आहे,” असं राजनाथ सिंह म्हणाले. “जेव्हापासून भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे तेव्हापासून काही भारत विरोधी शक्तींनी सीमांवर आणि सीमांद्वारे घुसखोरी करून भारतात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या सहा वर्षांणध्ये दहशतवादाविरोधात मोठा बदल झाला आहे आणि तो म्हणजे त्याला प्रत्युत्तर देणं. यापूर्वी काय व्हायचं? दहशतवादी हल्ले व्हायचे, आपले जवान त्यांना प्रत्युत्तर देत होते आणि पाकिस्तानकडे बोट दाखवणारे सर्व पुरावेही आपल्याला मिळत होते,” असंही ते म्हणाले.

“आता भारत देशाच्या सीमेच्या आत कारवाई करत आहे. परंतु गरज भासल्यास सीमा पार करूनही दहशतवाद्यांची ठिकाणं नष्ट करण्याचं काम आपले शूर जवान करत आहेत. पाकिस्ताचा भारताविरोधातील दहशवादाचं मॉडेल आता उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे आता पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. भारतानं पाकिस्तानचं ‘नर्सरी ऑफ टेररिजम’ हे रूप जगासमोर आणलं आहे,” असंही ते म्हणाले.