संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (शुक्रवार) लेहचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावाही घेतला. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी जवानांना संबोधित केलं. तसंच चीनलाही कठोर शब्दात इशारा दिला. “भारताच्या एक इंचही जमिनाला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही,” असं ते यावेळी म्हणाले. त्यांनी आज जवानांशी संवाद साधला आणि त्यांचं मनोबलही वाढवलं.

“जर भारताच्या स्वाभिमानावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यांना योग्य भाषेत उत्तरही दिलं जाईल. सध्या भारत आणि चीनदरम्यान जी काही चर्चा झाली ती सकारात्मक आहे. या प्रकरणाचा तोडगा निघाला पाहिजे. परंतु हा तोडगा कुठपर्यंत निघेल याची सध्या कोणतीही हमी मी आता देऊ शकत नाही,” असं ते लडाखमधील लुकुंग चौकीवर भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित करताना म्हणाले.

… तर जशास तसं उत्तर

“भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही किंवा त्यावर कब्जा करूही शकणार नाही याची मी शाश्वती देतो,” असंही ते यावेळी म्हणाले. “आम्हात अशांतता नाही तर शांतता हवी आहे. भारतानं कोणत्याही देशाच्या स्वाभीमानावर कधी हल्ला केला नाही. परंतु भारताच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर झाला तर ते सहन केलं जाणार नाही. त्यांना जशास तसं उत्तर देण्यात येईल,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.