भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र पुरस्कार परत घेण्यात यावा असा प्रस्ताव दिल्लीच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला. आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा कारण १९८४ मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप आप सरकारने केला आहे. याच आरोपामुळे आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

दिल्ली सरकारने मंजूर केलेल्या या प्रस्तावावर काँग्रेसने टीका केली आहे. राजीव गांधी यांनी या देशासाठी आपला जीव दिला, मात्र आपने त्यांच्याबाबत जो प्रस्ताव मंजूर केला आहे त्यामुळे आपचा खरा चेहरा जनतेसमोर आला अशीही टीका काँग्रेसने केली आहे. आप ही भाजपाची बी टीम असल्याचा आरोप अजय माकन यांनी केला आहे.

याच आठवड्यात १९८४ च्या शिखविरोधी दंगलीप्रकरणी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ३१ डिसेंबरपर्यंत त्यांना हजर राहण्याची तंबीही दिली आहे. अशात आपने राजीव गांधींचा भारतरत्न पुरस्कार काढून घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.