प्रेम हे आंधळं असतं……वगैरे बरंच काही आपण नेहमी ऐकतो. यालाच साजेसं एक उदाहरण समोर आलं आहे. एक तरुण तृतीयपंथीयाच्या प्रेमात पडला होता, त्याच्या वडिलांना याबाबत समजलं आणि त्यांनी त्या तृतीयपंथीयाला मारहाण केली. मारहाणीमुळे संतापलेल्या तृतीयपंथीयाने जमावासमोरच कपडे उतरवून हंगामा सुरू केला,दोन तासांनंतर पोलीस आले आणि प्रकरण थोड्याफार प्रमाणात शांत झालं. दिल्लीजवळील शाहपूर जाट गावातील ही घटना आहे.

या गावातील एक तरुण तृतीयपंथीयाच्या प्रेमात पडला होता. नेहमी तो त्याला भेटायला जायचा. काही दिवसांनी त्याच्या वडिलांना ही गोष्ट समजली आणि ते चांगलेच संतापले. गावातल्यांसमोर तू आमचं नाक कापशील, पुन्हा तृतीयपंथीयाला भेटायचे नाही अन्यथा घराबाहेर काढू असं वडिलांनी त्याला बजावलं. त्यामुळे त्या मुलाने तृतीयपंथीयाला भेटणे बंद केले. दोघांची शेवटची भेट जन्माष्टमीच्या दिवशी झाली होती. बरेच दिवस झाले तरी भेट न झाल्यामुळे रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो तृतीयपंथीय दोन अन्य तृतीयपंथीयांसह तरुणाला भेटायला गावात गेला. तृतीयपंथीय गावात आल्याचं तरुणाला समजताच तो देखील त्याला भेटायला पोहोचला. याबाबतची माहिती तरुणाच्या वडिलांना मिळाली. वडील साथीदारांसह तेथे पोहचले आणि त्यांनी मुलासह तृतीयपंथीयांना चोपून काढले. मारहाणीमुळे संतापलेल्या तृतीयपंथीयांनी जमावासमोरच कपडे उतरवून गोंधळ घालायला सुरूवात केली. त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आलं, तरीही तृतीयपंथीय शांत झाले नाहीत. जवळपास दोन तास त्यांनी तेथे गोंधळ घातला. पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ते शांत झाले. तृतीयपंथीयांची वैद्यकीय चाचणी करण्यात असून दोन्ही बाजूंना सामंजस्याने प्रकरण मिटवण्याच्या सूचना दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आली नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.