दिल्लीकरांना दिलासा देणारी बातमी आहे. दिल्लीत गेल्या १५ दिवसांत करोना रुग्णसंख्येत घट झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. १५ दिवसांपूर्वी दिल्लीत करोना रुग्ण वाढीचा दर ३५ टक्क्यांवर पोहोचला होता. आता करोना रुग्ण वाढीचा दर १४ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे रुग्णालयात बेड्स रिकामी झाले असून नातेवाईकांची वणवण थांबली आहे.

‘दिल्लीत ऑक्सिजनची मागणी ५८२ मेट्रीक टनवर आली आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला पत्र लिहून आमचं काम ५८२ मेट्रीक टनमध्ये होत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे आमच्या कोट्यातील अतिरिक्त ऑक्सिजन इतर राज्यांकडे वळवा, अशी विनंती केली आहे. गेल्या २४ ते ४८ तासात रुग्णालयातून क्वचितच ऑक्सिजनसाठी कॉल येत आहे’, असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिल्लीला ७०० मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. मात्र केंद्र सरकारने दिल्लीला फक्त एकच दिवस ७०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला होता.

Covid 19: “…आपल्याला उशीर झाला”; मोदी सरकारचा उल्लेख टाळत ICMR च्या प्रमुखांची कबुली

दिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तीन वेळा हा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. आता १७ मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनामुळे ४१२० जण मृत्युमुखी पडल्यामुळे देशातील करोनामृत्यूंचा आकडा २,५८,३१७ वर पोहोचला आहे. याच कालावधीत आणखी ३,६२,७२७ जणांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे करोनाबाधितांची एकूण संख्या २,३७,०३,६६५ झाली आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केलं आहे. भारतीयांसाठी चिंताजनक बाब म्हणजे मागील २४ तासांमध्ये करोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा करोनाची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नव्याने करोनाबाधित झालेल्या रुग्णांची संख्या ही करोनामुक्त झालेल्यांपेक्षा १० हजारांनी अधिक आहे.