दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणाचा खटला राजधानीबाहेर हलविण्याची मागणी करणारी याचिका मंगळवारी सुप्रीम कोर्टाने फेटाळली. या प्रकरणातील सहा आरोपींच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.सरन्यायाधीश अल्तमास कबीर यांच्या नेतृत्त्वाखाली खंडपीठाने ती फेटाळली.
संबंधित याचिकाकर्त्यांच्यावतीने सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणारे वकील एम. एल. शर्मा यांना आरोपींनी वकीलपत्र दिलेले नाही, असा अहवाल दिल्लीतील सत्र न्यायालयाने सुप्रीम कोर्टाकडे पाठविला होता. त्या अहवालाच्या आधारे न्यायालयाने याचिका फेटाळली.
या प्रकरणात आरोपींनी शर्मा यांना युक्तिवाद करण्याची परवानगी दिलेली नाही, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे. त्यानंतर तटस्थ व्यक्ती म्हणून न्यायालयाने आपला युक्तिवाद ऐकून घ्यावा, अशी विनंती शर्मा यांनी न्यायालयाकडे केली. मात्र, ती देखील न्यायालयाने फेटाळली.