दिल्लीतील नेहरू विहार येथून दोन आठवड्यांपासून एक ११ वर्षीय मुलगा बेपत्ता होता. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो सर्वात शेवटी त्याच्या शेजारी राहणा-या दानिश बरोबर दिसला. यावर पोलीसांनी दानिशची चौकशी केली असता त्याने आपणच मुलाला पळवून त्याचा खून केल्याचे मान्य केले. दानिशने सांगितले की, मुलाच्या पालकांनी मला रागवले होते. याचा बदला घेण्यासाठीच मी त्याचा खून केला व त्याचा मृतदेह खजूरी उड्डाणपूलाखाली पुरला. पोलीसांनी त्याला अटक केली आहे.

पोलीस आयुक्त अतुल कुमार यांनी सांगितले की, आरोपीचा सखोल चौकशी सुरू आहे. याबरोबरच या हत्येमागे आणखी काही कारण आहे का याचा शोध घेतला जात आहे. याशिवाय त्याच्यावर लैगिंक अत्याचार तर करण्यात आले नाही ना, हे देखील माहिती करून घेतल्या जात आहे. आतापर्यंत केवळ दानिशने सांगितलेलीच आमच्याकडे माहिती आहे. मात्र शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व समोर येईल.

दानिशचा कोंबडी विक्रीचा व्यवसाय आहे. तो दिल्लीतील नेहरू नगरात मुलाच्या शेजारीच राहतो. काही काळ अगोदर त्याचे मुलाच्या घरच्यांशी चांगले संबंध होते. मात्र काही कारणास्तव त्यांनी काही दिवस अगोदर दानिशला रागावले होते. याचाच त्याच्या डोक्यात राग होता.