नोकरी देण्याच्या आमिषाने जयपूरमध्ये नेण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलींवर दहा जणांनी बलात्कार केला. पीडित मुलीने घटनास्थळावरून पळ काढून दिल्ली गाठली आणि या प्रकरणी पोलीसांकडे तक्रार दाखल केली. पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला नोकरी हवी होती. म्हणून तिने दिल्लीतील तिच्या घराशेजारी राहणाऱयांना विचारले. त्यांनी तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवले. ३० ऑगस्ट रोजी हे दाम्पत्याने पीडित मुलीला जयपूरला नेले आणि तिथे तिला एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले. तिथे काम करणाऱया मुकेश नावाच्या एका व्यवस्थापकाने आणि त्याच्या साथीदारांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर संबंधित मुलीने तेथून पळ काढून ३१ ऑगस्ट रोजी बसने दिल्ली गाठली. एक सप्टेबर रोजी मंगोलपुरी पोलीस ठाण्यात पीडित मुलीने तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलीसांनी तिचे शेजारी राहणारे दाम्पत्य रॉकी आणि राणी यांच्यासह महेश, अनिल, अर्जुन आणि कमल यांना अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त विक्रमजीत सिंग यांनी सांगितले. पीडित मुलीला आपणच जयपूरला घेऊन गेलो होतो, अशी कबुली रॉकी आणि राणी यांनी पोलीसांना दिली आहे.