२०१९ सालापर्यंत देशाला भाजपमुक्त करणे, हेच तृणमूल काँग्रेसचे उद्दिष्ट असेल, असे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. त्या बुधवारी कोलकातामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शहीद दिनाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. ‘२०१९ मध्ये भाजप भारत छोडो’ हाच आमच्या पक्षाचा नारा असेल, असे यावेळी ममतांनी सांगितले. लोकशाही, निधर्मीवाद आणि मानवी हक्कांना भाजपच्या राजवटीत धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही सर्व विरोधी पक्षांची मदत घेऊ, असेही ममता यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही ममतांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी राष्ट्रीय आघाडी स्थापन करण्याचे मनसुबे बोलून दाखवले आहेत. भाजपला विरोध करणाऱ्या कोणत्याही पक्षाला पश्चिम बंगाल पाठिंबा देईल. या पार्श्वभूमीवर ममतांनी ७ ऑगस्टपासून ‘भाजप भारत छोडो’ आंदोलन छेडले होते.

पश्चिम बंगाल हा सोनियांबरोबर आहे, आम्ही नितीश कुमारांबरोबर आहोत, अरविंद केजरीवालांसोबत आहोत, लालू प्रसाद यादव आणि नवीन पटनायक यांच्यासोबत आहोत. भाजपला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला आमचा पाठिंबा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या विरोधकांची महाआघाडी स्थापन होईल. त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होईल. २०१९ सालची निवडणूक आपल्यासाठी सोपी आहे, असा अनेकांचा समज आहे. मात्र, तो साफ चुकीचा आहे. त्यांच्या हा दावा खूपच पोकळ आहे. मोदींना पुढील लोकसभा निवडणुकीला फक्त ३० टक्केच मते मिळतील, असे भाकित ममतांनी वर्तवले.

मोदी सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाली तरी मोदी लाट ओसरली नसल्याचेच दिसते. ही मोदी लाट थोपवणाऱ्या दिग्गज चेहऱ्यांची नावं विरोधकांकडून घेण्यात आली. या नावांमध्ये नितीशकुमार यांचं नाव आघाडीवर होतं. तर राहुल गांधी, मायावती, अरविंद केजरीवाल ही नावंही अधूनमधून घेतली जात होती. पण देशाचं राजकारण या तीन वर्षांत पुरतं बदलून गेलं आहे. मोदींना टक्कर देणारी जी नावं घेतली जात होती, ती आता मागे पडली आहेत, असं सध्याचं चित्र आहे. नितीशकुमार यांनी भाजपच्या पाठिंब्यानं बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. पंजाबमधील निवडणुकांमध्ये बसलेल्या पराभवाच्या दणक्यानंतर अरविंद केजरीवाल हे चिडीचूप आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीत पराभव झाल्यानंतर मायावती गप्पगार झाल्या आहेत. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगाच्या राजकारणात अडकून पडल्या आहेत. तर प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं त्या राहुल गांधींना स्वतःच्या पक्षातूनच स्वीकारलं जात नाही, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.