छत्तीसगड आणि मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकीकडे छत्तीसगडमधील अंबिकापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभेदरम्यान काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मध्य प्रदेशातील देवरी सागर येथे थेट नरेंद्र मोदीवर टीका केली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिल्याची आठवण करुन दिली. चीन सरकार 24 तासात 50 हजार तरुणांना रोजगार देत आहे. मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडियासारख्या मोहिमेतून मोदी सरकार 24 तासात फक्त 450 जणांना रोजगार देण्यात यशस्वी होत आहे असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.

‘नरेंद्र मोदी येतात आणि 15 लाखाचं आश्वासन देतात. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन देतील. पण आपल्या भाषणात गेल्या साडे चार वर्षात किती तरुणांना रोजगार दिला यासंबंधी एकही शब्द उच्चारणार नाहीत. मध्य प्रदेश आणि केंद्र सरकारने किती जणांना रोजगार दिला आहे….कोणालाच नाही’, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, ‘नरेंद्र मोदींनी गेल्या साडे चार वर्षात देशातील श्रीमंतांचं तीन लाख 50 हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. मनरेगा चालवण्यासाठी 33 हजार कोटी रुपये लागतात, पण मोदींनी त्याच्या 10 टक्के पैसे आपल्या निवडक व्यवसायिकांना दिले आहेत’.

‘मी मोदींच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी त्यांना एक प्रश्न विचारला की, मला सांगा तुम्ही 15-20 लोकांचे तीन लाख कोटी रुपये माफ केलेत. तुम्ही शेतकऱ्यांचा बोनस हिसकावून घेता. त्यांना योग्य मूल्य देण्याचं आश्वासन दिलं, पण देत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ का करत नाही…यावर ते काहीच बोलले नाहीत’, असं राहुल गांधींनी सांगितलं.

यावेळी राहुल गांधींनी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार आलं तर 10 दिवसांत शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल, 11 वा दिवस लागणारच नाही असं आश्वासन दिलं. ‘नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावर बोलायचे. पण आजकाल त्यांच्या भाषणात भ्रष्टाचाराचा उल्लेख नसतो. नोटाबंदीपेक्षा मोठा घोटाळा आपल्या देशात झालेला नाही. येणाऱ्या काळात हे सिद्ध होईल. मोदींनी गरिबांच्या खिशातून पैसा काढून तोच पैसा श्रीमंतांच्या खिशात टाकला आहे’, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे.