गुरूग्राम येथे सात वर्षांच्या मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर फोर्टिस रूग्णालयाने पालकांच्या हाती चक्क १६ लाखांचे बिल हाती टेकवले. सुमारे १५ दिवस या मुलीवर फोर्टिस रूग्णालयात उपचार सुरू होते. १६ लाखांचे बिल पाहताच मुलीच्या आई-वडिलांना धक्काच बसला. मुलीच्या पालकांनी फोर्टिस रूग्णालयाने मुलीचा मृत्यू होऊनही आम्हाला अंधारात ठेवले. तिचा मृत्यू झाल्यानंतरही आम्हाला सांगितले नसल्याचा आरोप केला. दरम्यान, याप्रकरणी आता केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी लक्ष घातले असून याप्रकरणी योग्य ते पाऊल उचलण्याची त्यांनी ग्वाही दिली आहे.

आद्या सिंग नावाच्या ७ वर्षांच्या मुलीला दि. ३१ ऑगस्ट रोजी डेंग्यूमुळे फोर्टिस रूग्णालयात दाखल केले होते. १४ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. आद्या आपल्या आई-वडिलांबरोबर द्वारका येथे राहत होती. आद्याच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीला तीन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. याचा तिच्यावर आरोग्यावर कोणताच परिणाम होत नव्हता. रूग्णालयाने दोन आठवड्याचे १५.६ लाखांचे बिल आद्याच्या कुटुंबीयांना दिले. यामध्ये ६११ सिरिंज आणि १५४६ ग्लोव्हजच्या जोड्यांचाही समावेश आहे.

मृत आद्याचे वडील जयंत सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, रूग्णालयाने आद्याला गाऊन परिधान करण्यास भाग पाडले. त्याचे त्यांनी ९०० रूपये घेतले. ज्यावेळी त्यांनी आद्याला उपचारासाठी दुसऱ्या रूग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला तेव्हा फोर्टिस रूग्णालयाने त्यांच्या हाती मृत्यू दाखलाच सोपवला.

आद्याचा मेंदू ७० टक्के निकामी झाल्यानंतरही तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. एमआरआयमध्ये तिचा मेंदू ७० ते ८० टक्के इतका बाधित झाल्याचे दिसून आले. जर आम्ही रूग्णालय सोडले तर मृत्यू दाखला देणार नसल्याचे आम्हाला बजावण्यात आले. त्यावेळी एका डॉक्टरांनी माझ्या पत्नीशी संपर्क साधला आणि त्यांनी १५ ते २० लाखांत पूर्ण बॉडी प्लाझमा ट्रान्सप्लंटचा प्रस्ताव ठेवला.

दरम्यान, रूग्णालयाचे माध्यम प्रमुख अजेय महाराज यांनी फोर्टिस रूग्णालयाने सर्व वैद्यकीय प्रोटोकॉल आणि वैद्यकीय मार्गदर्शिकेप्रमाणेच उपचार केल्याचा खुलासा केला. सुमारे २० पानांचे विस्तृत बिल सिन्हा कुटुंबीयांना दिल्याचे त्यांनी सांगितले. या १५ दिवसांत आद्यावर यांत्रिक व्हेंटिलेशन, हाय फ्रिक्वेन्सी व्हेंटिलेशन, इंट्रोप्स, प्रतिजैविके, वेदनाशामक आणि अॅन्लजेसियासारखे उपचार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.

परंतु, पीडित कुटुंबीयाने या प्रकाराच्या चौकशीची मागणी केली आहे. सरकारने याची चौकशी करावी आणि कायद्यात दुरूस्तीची गरज असल्यास त्याप्रमाणे करावे, असे अपील करत जयंत यांनी मला झालेला त्रास इतरांना होऊ नये, असे मत ‘एएनआय’कडे व्यक्त केले.