मोदी सरकार बलाढ्य संख्याबळाने दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत येऊन अद्याप वर्ष पूर्ण झालेलं नाही. परंतु, सध्या देशातील विविध आंदोलने आणि प्रश्न यांमुळे परिस्थिती बदलल्याचे चित्र आहे. या परिस्थितीत देशात आता जर निवडणुका झाल्या तर कोण जिंकणार? मोदींना पुन्हा तेच बलाढ्य बहुमत मिळणार का? की लाट ओसरल्याचं पाहायला मिळणार आणि आता वेगळं काही घडणार? कोणत्या राज्यात बदल घडेल? अशा प्रश्नांचा वेध एका सर्व्हेतून घेण्यात आला आहे.

देशातील राजकीय स्थितीचा अंदाज घेण्यासाठी एबीपी न्यूज आणि सी व्होटरने सर्वे घेतला. गेल्या तीन महिन्यांमध्ये सर्व ५४३ लोकसभा मतदारसंघातील तब्बल ३० हजार २४० लोकांशी चर्चा करून हा सर्व्हे करण्यात आला.

काय सांगतो सर्व्हे?
1. वरकरणी मोदी सरकारच्या निर्णयामुळे वातावरण सरकारविरोधी दिसत असले तरी आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट कायम आहे.
2. देशातील ५६ टक्के लोक मोदी सरकारवर खूश आहेत. २४ टक्के लोक काही प्रमाणात समाधानी आणि २० टक्केच लोक असमाधानी असल्याचं या सर्व्हेमध्ये आढळून आले आहे.
3. आता निवडणुका झाल्यास एनडीएला ३३० जागा मिळतील. म्हणजेच पुन्हा एनडीएचेच सरकार केंद्रात स्थापन होईल, असे या सर्व्हेत आढळले आहे. काँग्रेस आणि युपीएला 130 जागा मिळतील अशी शक्यता आहे. मात्र 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत एनडीएला थोडं नुकसान होत असल्याचे चित्र आहे.

आता निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा?
                आता                      2019 मधील जागा
एनडीए    -330 जागा                 353 जागा
यूपीए      -130 जागा                  96 जागा
अन्य       -83 जागा                     93 जागा

या सर्व्हेतून असे दिसून येते की २०१९च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या जागांपेक्षा आता निवडणुका झाल्यास मिळणाऱ्या जागांमध्ये घट होते. एनडीएला जवळपास २३ जागा कमी मिळतील. सरकार मात्र एनडीएचेच येईल.

दुसरीकडे यूपीएच्या जागा मात्र काहीशा वाढतील, असे आढळून आले आहे. आता निवडणुका झाल्यास यूपीएला ३४ जागांचा फायदा होईल, असा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या या सर्व्हेमध्ये वर्तवण्यात आला आहे.