भारताने डिजिटल अर्थव्यवस्था विकसित करण्यासाठी चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. कंपन्या, दुकानदार आणि नागरिक डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून व्यवहार करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून डिजिटल व्यवहारांना गती मिळताना दिसत आहे. जुलै महिन्यात ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांचा विक्रमी डिजिटल व्यवहार झाला आहे. ३२४ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून ६ लाख ६ हजार २८१ कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आहे. भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी यूपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही यंत्रणा विकसित केली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया डिजिटल व्यवहार वाढावे यासाठी प्रयत्नशील आहे.

मागच्या तीन महिन्यातील डिजिटल व्यवहार

  • मे २०२१ मध्ये २५३ कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ४ लाख ९० हजार ६३८ कोटी रुपयांचा व्यवहार झाला.
  • जून २०२१ मध्ये २८० कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ५ लाख ४७ हजार ३७३ कोटी रुपयांचा व्यवहार झाला.
  • जुलै २०२१ मध्ये ३२४ कोटी देवाणघेवाणीच्या माध्यमातून ६ लाख ०६ हजार २८१ कोटी रुपयांचा व्यवहार झाला.

केंद्रातील मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी केल्यानंतर ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. काळ्या पैशांवर अंकुश लावण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून डिजिटल व्यवहारांना चालना दिली जात आहे. सरकारच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कार्यक्रम राबविले जात आहेत.