नक्षलवाद्यांप्रती सहानुभूती दाखवणाऱ्यांवर अटकेची कारवाई केल्याने काँग्रेसकडून भाजपावर टीकसत्र सुरु आहे. याला भाजपानेही उत्तर दिले असून काँग्रेस पक्ष नक्षलवाद्यांप्रती सहानुभूती दाखवणारा पक्ष असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी भाजपाचे प्रवक्ते संबीत पात्रा यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि जयराम रमेश यांनाही नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याचे सांगत टीका केली.

पात्रा यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यावरही आरोप केले आहेत. ते म्हणाले, पोलिसांच्या चौकशीदरम्यान एक पत्र असेही मिळाले आहे, ज्यात आंदोलनासाठी नक्षलवाद्यांना निधी देण्याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा फोन नंबर मिळाला आहे, जे राहुल गांधींचे गुरु आहेत. सुरेंद्र गडलिंग आणि प्रकाश नामक दोन कॉम्रेड्सनी २५ सप्टेंबर २०१७ रोजी लिहीलेल्या पत्रात दिग्विजय सिंह यांचा फोन क्रमांक तपास पथकांना मिळाल्याचा दावा संबित पात्रा यांनी केला आहे.

पात्रा म्हणाले, काँग्रेस जेव्हा सत्तेत राहिली त्यांनी नक्षलवाद्यांप्रती दुहेरी धोरण ठेवले. यावेळी मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे इतर काही लोक म्हणायचे की, नक्षलवाद्यांशिवाय कोणाकडूनही देशाला मोठा धोका नाही. त्याच्या सरकारमधील मंत्र्यांपैकी निम्मे नक्षलवाद्यांच्या बाजूने होते तर निम्मे लोक विरोधात होते. राष्ट्रीय सुरक्षेशी काँग्रेस कुठल्याही स्तरावर जाऊन तडजोड करु शकते असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान पात्रा यांनी माजी मंत्री जयराम रमेश यांच्यावरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या महेश राऊतला युपीए सरकारच्या काळातही अटक झाली होती. मात्र, त्यावळी रमेश यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून राऊत सज्जन व्यक्ती असल्याचे म्हटले होते.