काश्मीरचे वर्णन पाकिस्तानची ‘दुखरी नस’ असे करणाऱ्या पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत पाकिस्तानने ‘काश्मीर एकता दिवस’चा वार्षिक उपचार पार पाडला.
 लहानपणापासून माझे काश्मीरशी भावनिक नाते असून, ‘पाकिस्तानची दुखती नस’ असलेल्या काश्मीरच्या जनतेच्या अधिकारांसाठीचा लढा मी सुरूच ठेवीन, असे मुझफ्फराबाद येथे पाकव्याप्त काश्मीर विधानसभेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना शरीफ म्हणाले.
काश्मीरचे प्रश्न न्याय्य रीतीने सुटले तरच दक्षिण आशियात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होणे शक्य आहे. या भागातील दीडशे कोटींहून अधिक लोकांचे भवितव्य काश्मीर प्रश्नाशी जुळलेले आहे. काश्मिरी लोकांच्या इच्छेविरुद्धचा कुठलाही निर्णय पाकिस्तानी सरकार मान्य करणार नाही. काश्मीरच्या लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क देणे हा काश्मीर प्रश्न सोडवण्याचा एकमेव न्याय्य उपाय आहे, असे शरीफ यांनी सांगितले.
काश्मीरवरील अत्याचाराचे ढग लवकरच दूर होऊन काश्मिरी लोकांना स्वातंत्र्याची पहाट पाहता येईल तो दिवस फार दूर नाही, असे शरीफ यांनी म्हटल्याचे वृत्त पाकिस्तानी नभोवाणीने दिले आहे.