भारताचे मेट्रो मॅन ई. श्रीधरन मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहेत. श्रीधरन हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर त्यांनी अनेक विषयांवर मत प्रदर्शन केलं. श्रीधरन यांनी २१ फेब्रुवारी रोजी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी एक देशभक्त म्हणून चांगलं सरकार देणं आणि देशाच्या एकतेला तसेच सुरक्षेला बाधा पोहचवणाऱ्या विषयांसंदर्भात कठोर करावाई करणं आपलं काम असल्याचं म्हटलं आहे. दिशा रवी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीधरन यांनी डिजिटल अ‍ॅक्टीव्हीझमसंदर्भातही कठोर कारवाई करण्यात आली पाहिजे असं मत नोंदवलं आहे.

आणखी वाचा- लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवं; दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचं ट्विट

केरळमध्ये एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर श्रीधरन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. डिजिटल अ‍ॅक्टीव्हीझम हे अपायकारक असते असं मत श्रीधरन यांनी नोंदवलं आहे. दिशा रवी या २१ वर्षीय पर्यावरणवादी तरुणीला शेतकरी आंदोलनाला समर्थन करणारं टूलकीट शेअर केल्याबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. याचसंदर्भातील प्रश्नावर बोलताना श्रीधरन यांनी असे डिजिटल कार्यकर्ते हे खोडकर असल्याचे म्हटले आहे.

“यामुळे देशाची प्रतिमा मलीन होते. अशा गोष्टींविरोधात तातडीने कारवाई केली पाहिजे. मी त्यांना तुरुंगामध्ये टाका असं म्हणत नाही. मात्र देशाच्या मान सन्मानाला हानी पोहचवणाऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे,” असं श्रीधरन यांनी म्हटलं आहे. सीएएविरोधात झालेल्या आंदोलनाचीही गरज नव्हती असं मतही श्रीधरन यांनी व्यक्त केलं आहे. हे अडचणी निर्माण करणारे घटक आहेत, असं आंदोलनकर्त्यांबद्दल बोलताना श्रीधरन यांनी म्हटलं आहे. “हे असे लोकं आहेत जे मोदी सरकारच्या कामावर समाधानी नाहीयत. मोदी सरकारने काहीही केलं तरी त्याला विरोध केला जातो. सरकारसोबत हातमिळवणी करुन सराकात्मक टिकेच्या माध्यमातून सुधारणा करता येतील मात्र आंदोलन करुन हे लोकं अडचणी का निर्माण करतात?”, असा प्रश्न श्रीधरन यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- टूलकिट प्रकरण; बीडचे शंतनू मुळूक यांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी

“लव्ह जिहाद आणि गोमांस खाणे या दोन्ही गोष्टी केरळमधील बहुतांश लोकांच्या विरोधात आहेत. असे विषय मुद्दाम चर्चेत आणले जातात. अशा विषयांमुळे लोकांमते मतभेद निर्माण होतात. त्यामुळेच या विषयांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं मत श्रीधरन यांनी व्यक्त केलं आहे.