भारताच्या सर्वांत ज्येष्ठ नेत्यांमध्ये करूणानिधी यांच्या नावांचा समावेश होता. त्यांच्या निधनामुळे दक्षिण भारतातील राजकारणात कमालीची पोकळी निर्माण झाली आहे. राजकारणात येण्यापूर्वी करूणानिधी यांनी तामिळ चित्रपटसृष्टीत प्रचंड यश मिळवले होते. उत्कृष्ट पटकथा लेखक म्हणून त्यांची चित्रपटसृष्टीत ओळख होती. पटकथा लेखक म्हणून आपल्या कारकीर्दीला सुरूवात करणाऱ्या करूणानिधींनी समाजवादी आणि बुद्धिवादी आदर्शांना प्रोत्साहन देणाऱ्या ऐतिहासिक, सामाजिक (सुधारणावादी) कथा लिहिल्या. त्यांच्या या प्रयत्नालाही प्रचंड यश मिळाले. दक्षिणेत चित्रपटसृष्टीतील कलाकारांना मोठा सन्मान दिला जातो. अनेकवेळा त्यांची पुजाही केली जाते. याच पुज्यनीय व्यक्तिमत्वामध्ये करूणानिधी यांचाही समावेश होतो. चित्रपटातील यश, जबरदस्त मेहनत, चतुरस्त्र व्यक्तिमत्व यामुळे राजकारणातही ते कमालीचे लोकप्रिय ठरले. तामिळनाडूच्या जनतेने त्यांना ५ वेळा (१९६९-७१, १९७१-७६, १९८९-९१, १९९६-२००१ आणि २००६-२०११) मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. त्यांनी राजकुमारी या आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली. त्यांनी लिहिलेल्या सुमारे ७५ पटकथांमध्ये राजकुमारी, अभिमन्यू, मंदिरी कुमारी, मरूद नाट्टू इलवरसी, मनामगन, देवकी, पराशक्ती आणि तिरूम्बिपार आदींचा समावेश आहे. करूणानिधींना त्यांच्या अष्टपैलू प्रतिभेमुळेच त्यांना कलैगनार म्हटले जाते. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना अत्यंत प्रेमाने त्यांना हे नाव दिले होते. कलैगनार याचार अर्थ 'कला निपुण' असा होतो. त्याचबरोबर त्यांना मुथामिझ कविनार ही म्हटले जात. कलैगनार ही उपमा त्यांना अत्यंत समर्पक अशी होती. कारण ते अनेक क्षेत्रात यशस्वी राहिले. ते यशस्वी राजकारणी, मुख्यमंत्री, चित्रपट लेखक, गीतकार, साहित्यिकबरोबरच पत्रकार, प्रकाशक आणि व्यंगचित्रकारही होते.