देशातील ४७ प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे. आर्थिक वर्ष २०१५-१६ दरम्यान त्यांच्याकडे ७७.६३ कोटी रूपयांची देणगी प्राप्त झाली होती. तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना ५४.९३ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष तेलुगु देशम पार्टी (टीडीपी) आहे. त्यांचे २०१५-१६ मधील एकूण उत्पन्न हे १५.९७ कोटी रूपये इतके होते. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नाचे विश्लेषण करून एक अहवाल सादर केला असून त्यात हा दावा करण्यात आला आहे.

एडीआरच्या मते, या वर्षी ४७ पैकी ३२ प्रादेशिक पक्षांनी आपल्या उत्पन्न आणि खर्चाची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपवली होती. १५ पक्षांनी आपला लेखापरिक्षण अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केलेला नाही. सर्व राजकीय पक्षांना ३१ ऑक्टोबरपर्यंत आपला लेखापरिक्षण अहवाल सादर करायचा होता. उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, बिहारमधील राष्ट्रीय जनता दलासहित जेकेएनसी, आयएनएलडी, एआययूडीएफ, एजेएसयू, एमजीपीनेही आपले विवरण पत्र सादर केलेले नाही.

एडीआरच्या मते २०१५-१६ दरम्यान ३२ प्रादेशिक पक्षांना एकूण २२१.४८ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यातील ११० कोटी रूपये खर्च करण्यात आले नाही. हे एकूण उत्पन्नाच्या ४९ टक्के इतके आहे. या अहवालानुसार सर्वांत जास्त खर्च करणाऱ्यांमध्ये संयुक्त जनता दल, टीडीपी आणि आप आहे. बिहारमधील सत्ताधारी संयुक्त जनता दलाने २०१५-१६ दरम्यान एकूण २३.४६ कोटी रूपये खर्च केले. तर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी टीडीपीने १३.१० कोटी आणि दिल्लीतील सत्ताधारी आपने एकूण ११.०९ कोटी रूपये खर्च केले.

३२ पैकी १४ प्रादेशिक पक्षांनी आपल्या एकूण उत्पन्नापेक्षा खर्चाची माहिती आयोगाकडे सोपवली आहे. यामध्ये झारखंडचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चा- प्रजातांत्रिक, जेडीयू, आयएनएलडीचा समावेश आहे. यांनी २०१५-१६ दरम्यान आपल्या उत्पन्नापेक्षा २०० टक्के खर्च केला आहे. एआयएमच्या एकूण उत्पन्नापैकी ८० टक्के खर्च केलेला नाही.