दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला एक अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना कृष्ण आणि अर्जुन असे म्हटला होता. अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर त्याने ही स्तुतीसुमनं उधळली होती. असं असेल तर सद्यस्थितीत कौरव कोण आणि पांडव कोण? असा प्रश्न उपस्थित करत एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी अनुच्छेद ३७० वरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

एवढंच नाही तर मोदी सरकारचं काश्मीरवर प्रेम आहे पण तिथल्या नागरिकांवर नाही, त्यांना फक्त तिथले भूखंड प्रिय आहेत. त्याचमुळे काश्मीरच्या जनतेचं हित लक्षात न घेता निर्णय घेतले जातात असेही ओवेसी यांनी म्हटले आहे. या सरकारला देशात महाभारत घडवायचं आहे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मोदी सरकारचं काश्मीरवर प्रेम आहे, तिथल्य काश्मिरींवर नाही. या सरकारला तिथले भूखंड, जमिनी प्रिय आहेत, तिथे कोण वास्तव्य करतं याच्याशी घेणं देणं नाही. यांना सत्ता प्रिय आहे मात्र न्याय नाही अशी टीका ओवेसी यांनी त्यांच्या भाषणात केली.

अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका केली जाते आहे. अनुच्छेद ३७० मुळे जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला होता. मात्र तो हटवण्यात आला. तेव्हापासून विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेचे ताशेरे झाडायला सुरुवात केली आहे. त्यात आता ओवेसी यांचीही भर पडली आहे.

काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणं असंवैधानिक आहे अशी टीका प्रियंका गांधी यांनी मंगळवारीच केली होती. तसेच त्यांच्या आधी राहुल गांधी यांनीही अशीच टीका केली होती. आता MIM चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही अशीच टीका केली आहे काश्मीरमध्ये कोण राहतं, त्यांचे प्रश्न काय याच्याशी या सरकारला काहीही घेणंदेणं नाही. मोदी सरकारचं फक्त काश्मीरच्या जमिनीवर आणि भूखंडांवर प्रेम आहे असाही टोला ओवेसी यांनी लगावला.