पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावून भारतातून पसार झालेल्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करणाऱ्या मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे. भारतातून फरार झाल्यानंतर अँटिग्वा आणि बारबुडाचं नागरिकत्व घेऊन स्थायिक झालेल्या मेहुल चोक्सीला नुकतीच डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली. यानंतर मेहुल चोक्सीचं थेट भारतात प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरु असताना डोमिनिका कोर्टाने मात्र प्रत्यार्पणावर स्थगिती आणली आहे.

बेकायदेशीरपणे देशात प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. यादरम्यान अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी मेहुल चोक्सीचं थेट भारतात प्रत्यार्पण करा असं डोमिनिकाला सांगितलं आहे. दरम्यान कोर्टाने पुढील आदेशापर्यंत मेहुल चोक्सीचं प्रत्यार्पण केलं जाऊ नये असा आदेश दिला आहे. याशिवाय मेहुल चोक्सीला कायदेशीर मदत आणि वकिलांशी संपर्क साधण्याची परवानगी देण्यात आली आहे. मेहुल चोक्सीचे वकील विजय अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २८ मे रोजी होणार आहे.

मेहुल चोक्सीचं अँटिग्वामधून अपहरण करुन छळ; शरीरावर मारहाणीच्या खुणा; वकिलांचा कोर्टात दावा

मेहुल चोक्सीच्या वकिलांकडून हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्यात आल्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला. मेहुल चोक्सीला भेटण्याची परवानगी दिली जात नसल्याचं त्याचा वकिलांनी म्हटलं होतं.

याचिकेमध्ये वकिलांनी मेहुल चोक्सीचा छळ करण्यात आला असून त्याच्या शरिरावर जखमा असल्याचा दावा केला होता. तसंच मेहुल चोक्सीचं अँटिग्वा आणि बारबुडामधून येथून अपहरण करण्यात आलं असाही दावा वकिलांनी केला होता. मेहुल चोक्सीच्या वकिलांनी यावेळी कायदेशीर मदतीसाठी असणाऱ्या घटनात्मक हक्कांकडे कोर्टाचं लक्ष वेधलं होतं.

मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही फरार?; स्थानिक पोलिसांकडून शोध सुरु

“डोमिनिकामध्ये आमच्या वकिलाला फक्त दोन मिनिटांसाठी मेहुल चोक्सीला भेटण्याची परवानगी देण्यात आली. यावेळी त्यांनी आपला भयानक अनुभव सांगितला. अँटिग्वा येथील जॉली हार्बर येथून आपलं अपहरण करुन डोमिनिका येथे नेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. अनेक लोक यावेळी उपस्थित होते,” असं विजय अग्रवाल यांनी एएनआयला सांगितलं होतं.

मेहुल चोक्सीचं डोमिनिकामधून थेट भारतात प्रत्यार्पण होऊ शकतं का असं विचारण्यात आलं असता विजय अग्रवाल यांनी भारतीय कायद्याप्रमाणे अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व मिळताच मेहुल चोक्सीने भारतीय नागरिकता रद्द केली असल्याचं त्यांनी सांगितलं. इमिग्रेशन आणि पासपोर्ट कायद्याप्रमाणे त्याचं फक्त अँगिग्वामध्येच प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं असंही त्यांनी सांगितलं.

मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार ५०० कोटींचा चुना लावल्यानंतर भारतातून फरार झाले होते. नीरव मोदी सध्या लंडनमधील जेलमध्ये असून भारतात प्रत्यार्पण होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. दरम्यान मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्याआधी २०१७ मध्ये अँटिग्वा आणि बारबुडा देशांचं नागरिकत्व घेतलं होतं.