विश्वचषक स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी विजय मिळवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विट करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. भारताचा हा पाकिस्तानवर दुसरा स्ट्राईक होता असं त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं. या ट्विटला पाकिस्तान लष्कराचे पाकिस्तानचे मेजर जनरल आणि मीडिया विंग इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशन (आईएसपीआर) चे महानिदेशक आसिफ गफूर यांनी उत्तर दिले आहे. क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तानला भारतीय संघाने दिलेली मात आणि दोन्ही देशांमधील युद्धजन्य परिस्थितीची तुलना करु नका असे आवाहन गफूर यांनी आपल्या वैयक्तिक ट्विटर अकाऊण्टवरुन ट्विट करुन केले आहे.

‘भारताने पाकिस्तानवर केलेला हा दुसरा स्ट्राईक होता, जो की टीम इंडियाने केला होता आणि याचा निकालही तोच लागला. उत्कृष्ट खेळाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन, या विजयाबद्दल प्रत्येक भारतीयास अभिमान वाटत आहे व प्रत्येकजण आनंदोत्सव साजरा करत आहे.’ असे ट्विट शाह यांनी भारताच्या विजयानंतर केले होते. शाह यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले.

पाकिस्तानच्या गफूर यांनी ट्विटवरुन शाह यांच्या या व्हायरल ट्विटला उत्तर देणारे ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये गफूर म्हणतात, ”प्रिय अमित शाह, तुमचा संघ सामना जिंकला. त्यांनी खूप चांगला खेळ केला. मात्र दोन वेगळ्या स्तरावरील गोष्टींची तुलाना होऊ शकत नाही. त्यामुळे स्ट्राइक आणि या सामन्याची तुलना केली जाऊ शकत नाही.” तसेच गफूर यांनी भारताने केलेल्या एअरस्ट्राइकनंतर केलेल्या प्रतिहल्ल्याची आठवणही या ट्विटमधून शाह यांना करुन दिली. ‘जर तुम्हाला शंका असेल तर भारतीय हवाई दलाने २७ फेब्रुवारी रोजी हवाई हद्द ओलांडून केलेल्या हल्ल्याला आम्ही नवशेरामध्ये दिलेल्या उत्तरात भारताची दोन जेट विमाने आम्ही पाडली होती. त्यामुळे तुम्ही केवळ आश्चर्य करत बसा,’ असं गफूर ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

तसेच अन्य एका ट्विटमध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे नुकसान झाल्याचा दावा करत शाह यांच्या निकाल सारखाच निघाला यावर टिप्पणी केली आहे.

दरम्यान, या विजयानंतर देशभरात आनंद साजरा केला जात असतानाच पाकिस्तानी चाहत्यांनी मैदानाबाहेर तसेच सोशल नेटवर्किंगवरुन या पराभवानंतर संताप व्यक्त केला आहे.