लॉगडाउन लागू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदी यांनी लॉगडाउनच्या काळात जनतेकडून करण्यात येत असलेल्या सहकार्याचं कौतुक केलं. जनता कर्फ्यूतून भारतीयांनी जगासमोर आर्दश ठेवला आहे. कुणीही एकटं समजू नये १३० कोटी जनतेची ताकद प्रत्येक भारतीयासोबत असल्याचं सांगतानाच मोदी यांनी ५ एप्रिलला नऊ मिनिटं मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल फ्लॅश लावण्याचं आवाहन केलं. मात्र, हे करत असताना जनता कर्फ्यूला केलेली चूक करू नका,” असं आवाहनही मोदी यांनी केलं आहे.

आणखी वाचा- मोदींचं आवाहन: रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे लाइट बंद ठेऊन, मेणबत्ती, फ्लॅशलाइट लावा

देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले,”करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा सर्वाधिक फटका देशातील गरीब जनतेला बसला आहे. मात्र, जनता कर्फ्यूप्रमाणेच लॉकडाउनला लोकांनी सहकार्य केलं आहे. भारतात जनतेला ईश्वराचं रुप समजलं जातं आणि करोनामुळे निर्माण झालेल्या अंधःकारातून बाहेर पडण्यासाठी मी जनतेकडे काही मागत आहे. मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत. पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटं घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. मात्र, हे करत असताना जनता कर्फ्यूवेळी चूक करू नका. तुम्हाला सोशल डिस्टन्सिग पाळायचं आहे. कुणीही एकत्र यायचं नाही. कुठेही गर्दी करायची नाही. एकटं राहायचं आहे. एकटं राहुनच हे करायचं आहे. करोनाची साखळी तोडण्यासाठी हाच रामबाण उपाय आहे,” असं मोदी म्हणाले.

आणखी वाचा- नरेंद्र मोदींच्या भाषणातील नऊ महत्त्वाचे मुद्दे

जनता कर्फ्यूवेळी लोकांनी एकत्र येत. रस्त्यावर मिरवणूक काढत टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याच्या आवाहनाला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे गर्दी कमी करण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला होता. दरम्यान, मोदी यांच्या मेणबत्ती पेटवण्याच्या आवाहनावरून आता सोशल मीडियात टीका सुरू झाली आहे. तर काही जणांनी या कल्पनेचं स्वागतही केलं आहे.