एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे. २ ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. कंपनीनं दोन वेळा नियमांचं उल्लंघन केलं आहे.

दरम्यान, दुबईला एअर इंडियाच्या विमानातून गेलेल्या करोनाग्रस्त प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाइन ठेवण्याचा खर्चही एअर इंडियाला करावा लागणार आहे. दुबईसाठी एअर इंडिया एक्स्प्रेसला पुन्हा विमानं सुरू करण्यासाठी, असे प्रकार पुन्हा थांबवण्यासाठी आणि सुधारणा करण्यासाठीही सांगण्यात आलं आहे. ४ सप्टेंबर रोजी जयपूरवरून दुबईला जाणार्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशानं प्रवास केला होता. तसंच त्याला त्यापूर्वीच करोनाची लागण झाली होती. परंतु त्यानंतरही कंपनीनं त्याला प्रवास करण्यास दिल्याचं सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा- Coronavirus: भारतातील रुग्णसंख्येने ओलांडला ५२ लाखांचा टप्पा

हे आहेत नियम

सरकारी विमान कंपनी एअर इंडियानं संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी गेल्या महिन्यापासून करोनाचे चाचणी अहवाल अनिवार्य केले आहेत. १२ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक वय असेलेल्या प्रवशांना विमानात प्रवास करण्यापूर्वी आपले नकारात्मक करोना अहवाल दाखवावे लागतात. मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रवाशांना सरकारमान्य चाचणी केंद्रातून नकारात्मक अहवाल मिळवणं अनिवार्य आहे. तसंच सर्वांची कोविड १९ पीसीआर चाचणी करणंही अनिवार्य आहे. परंतु विमान उड्डाण करण्याच्या ९६ तासांपूर्वीचंही ते असू नये असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.