देशाची राजधानी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. दिल्ली सरकार, हरयाणा आणि पंजाब सरकार यावर तोडगा काढण्यासाठी काथ्याकूट करताना दिसताहेत. तिकडे राष्ट्रीय हरित लवादानेही केंद्र व राज्य सरकारला फटकारले आहे. सम-विषम तारखेचा फंडा वापरण्याबाबतही चर्चा सुरू आहे. अनेकांना श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अनेकजण तोंडाला मास्क लावून बाहेर पडताना दिसत आहेत. पण आता काहींनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावला आहे. आम आदमी पक्षाचे निलंबित आमदार कपिल मिश्रा आणि भाजपचे आमदार मनजिंदर सिंग सिरसा यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला मास्क लावला आहे.

११ मूर्तीवरील असलेल्या मूर्तींना मास्क लावल्यामुळे या दोन्ही नेत्यांना चाणक्यपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कपिल मिश्रा आणि मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यात आप सरकारला अपयश आल्याचा आरोप करत ११ मूर्ती येथे निर्दशने केले आणि गांधीजी व इतर मूर्तींना मास्क लावला.

कपिल मिश्रा आणि सिरसा हे सातत्याने प्रदूषणाविरोधात आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी कनॉट प्लेस परिसरातील लोकांना मास्क वाटले होते. प्रदूषणावरून ते केजरीवाल सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याऐवजी विद्यमान सरकार हरयाणा आणि पंजाब सरकारबरोबर चर्चा करत आहेत. पण वास्तविकरित्या काहीच काम होत नसल्याचा आरोप केला आहे.