एकविसाव्या शतकात महासत्ता बनण्याकडे वाटचाल करणाऱ्या भारतात दर तासाला सरासरी एक महिला हुंडाबळी ठरत असल्याची धक्कादायक आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्यूरो (एनसीआरबी) या संस्थेने जाहीर केली आहे. २००७ ते २०११ या कालावधीत हुंडाबळी आणि तत्सम घटनांमध्ये वाढ झाल्याचेही निष्पन्न झाले आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील हुंडाबळींची संख्या २०१२ सालात ८ हजार २३३ इतकी होती. त्यावर आधारित सांख्यिकीनुसार दर तासाला एक महिला हुंडाबळी प्रकरणात मरण पावत असल्याची माहिती एनसीआरबीच्या अहवालातून समोर आली आहे. हुंडाबळी आणि तत्सम कारणांमुळे मरण पावलेल्या महिलांची संख्या २०११ साली ८ हजार ६१८ इतकी होती. २००७ साली ही आकडेवारी ८ हजार ९३ तर २००८ साली ८ हजार १७२ आणि २००९ साली हुंडाबळींची संख्या ८ हजार ३८३ इतकी होती. २०१० साली ८ हजार ३९१ महिला हुंडाबळी ठरल्या. हुंडाबळीच्या आकडेवारीमध्ये वाढ झाल्याबद्दल अनेक कारणांसाठी पोलीस अधिकाऱ्यांना दोषी धरले जात आहे. यासंदर्भात दिल्लीच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त (महिला व बालक विशेष शाखा) सुमन नालवा म्हणाल्या की, हुंडाबळी प्रकरणे फक्त मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्गापर्यंत मर्यादित राहिलेली नाहीत. उच्च उत्पन्न असलेल्या सामाजिक-आर्थिक स्तरातही हुंडय़ाची मागणी मोठय़ा प्रमाणावर केली जाते. समाजातील उच्चशिक्षित वर्गाकडूनही हुंडा घेण्यास नकार दिला जात नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.