फरार आर्थिक घोटाळेबाज विजय मल्या, नीरव मोदी आणि मेहूल चोक्सी या तिघांवर अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे. ईडीने या आरोपींची १५ हजार कोटींची संपत्ती जप्त करण्याची तयारी सुरु केली आहे. यानुसार, पहिली कारवाई लंडनला पळून गेलेला मद्य व्यापारी विजय मल्यावर होणार आहे. त्यानंतर नीरव मोदी, मेहुल चोक्सी, जतिन मेहता यांच्यावरही संपत्ती जप्तीची कारवाई होणार आहे.

ईडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बँकांचे कर्ज बुडवणारे तसेच विविध आर्थिक घोटाळ्याप्रकरणी खटले सुरु असणाऱ्या कोर्टांशी संपर्क साधत या सर्वांविरोधात नव्या अध्यादेशानुसार ईडीला कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, फरार आरोपींच्या देशातील तसेच परदेशातील संपत्तीवर तत्काळ जप्ती आणण्यात येणार आहे. आजवर ईडीच्यावतीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट (पीएमएलए) अंतर्गत जप्तीची कारवाई केली जाऊ शकत नव्हती. या कायद्यानुसार, संपूर्ण सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच ईडीला संपत्ती जप्तीची कारवाई करता येत होती. या प्रक्रियेला मोठा काळ लागत होता.

आर्थिक घोटाळ्यांतील या आरोपींविरोधात सीबीआय आणि ईडीच्यावतीने आपापले आरोपपत्र दाखल केल्यानंतर नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीचे प्रकरण नव्या अध्यादेशानुसार चालवले जाणार आहे. ईडीने मल्या प्रकरणात आजवर ९,८९० कोटी आणि नीरव मोदी-चोक्सी यांच्या प्रकरणात ७,६६४ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, नव्या अध्यादेशानुसार, पहिली कारवाई १५,००० कोटी रुपयांची संपत्ती जप्त होऊ शकते. त्यानंतर इतरही प्रकरणांमध्येही यापुढे अशाच प्रकारे कारवाई केली जाणार आहे.