पाच राज्यांच्या निवडणुका असल्याने निवडणूक आयोगाने या राज्यांमध्ये निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांना बंदी घातली आहे. ११ नोव्हेंबर ते चार डिसेंबपर्यंत ही बंदी असेल, असे निवडणूक आयोगाकडून कळवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने छत्तीसगढ, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान आणि दिल्ली या पाचही राज्यांच्या मुख्य निवडणूक आयोगाला याबाबत माहिती दिली आहे. चार डिसेंबर रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असल्याने त्या दिवशी संध्याकाळी साडेपाचपर्यंत निवडणूकपूर्व जनमत चाचण्यांना बंदी असेल. दूरचित्रवाहिन्यांनाही मतदानानंतर मतदारांच्या मुलाखती घेण्यात बंदी असेल. मतदानापूर्वी ४८ तास आधी जनमत चाचणीद्वारे निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यासही आयोगाने बंदी घातली आहे.